ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर मुंबईनंतर आता पुण्यातही झळकले आहेत. पुण्यातील काही भागांमध्ये हे बॅनर लागले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल पाहून मराठी जनतेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अखंड महाराष्ट्राच्या भल्यासाठी, ऐक्यासाठी तमाम मराठी जनता दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी मागणी करत आहे. राज साहेब, उद्धव साहेब हीच ती वेळ आहे, असा उल्लेख या बॅनरवर आहे. बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो या बॅनवर आहेत. त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राचा नकाशा आणि हुतात्मा स्मारक लक्ष वेधून घेत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर ठाकरे बंधुंच्या भूमिकेकडे राज्यातील लोकांचं लक्ष आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी मागणी मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून होत आहे. मुंबई आणि ठाण्यात कार्यकर्त्यांनी या संदर्भातील बॅनर लावले होते. त्यानंतर आता पुण्यातही हे बॅनर झळकले आहेत.