Manipur Violence Reacts Anna Hazare : मणिपूरमध्ये माथेफिरू जमावाने कुकी-झोमी समुदायातील दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक अत्याचार केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. याचबरोबर देशपातळीसह जगभरात याचे पडसाद पडले . या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रस्न निर्माण झाला असून, केंद्र सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढले आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी आज या घटनेवर भाष्य केलं आहे.
अण्णा हजारे म्हणाले की,मणिपूर घटना म्हणजे कलंक आहे. महिलांची विवस्त्र धिंड काढणाऱ्यांना फाशीवर लटकवले पाहिजे.दुर्देवी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना याविषयावर बोलावं लागलं. पक्ष आणि पार्ट्या मात्र यावर बोलत नाहीत, अशी प्रतिक्रिया मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांनी दिली.
आणखी दोघींवर तोंडात बोळा कोंबून अत्याचार
दरम्यान, मणिपूरमध्ये आणखी दोन महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडल्यादिवशीच या दुसऱ्या दोन महिलांवरही सामूहिक बलात्कार करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. 21 आणि 24 वर्षीय या महिला आहेत. महिलांनी ओरडू नयेत म्हणून त्याच्या तोंडात बोळा घालण्यात आला होता. याबाबत 16 मे रोजी एका पीडितेच्या आईने याबबात फिर्याद नोंदवली होती.