प्रतिनिधी/ फोंडा
शापूर फोंडा ते कुर्टी चौपदरी महामार्ग खुला झाल्याने कदंब बसस्थानक व चिरपुटे भागात जाणाऱया वाहनांना फर्मागुडी येथील जीव्हीएम कॉलेजजवळील सर्कलपर्यंत वळसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे आता जीव्हीएम सर्कलजवळ वाहनांची वर्दळ आणि गोंधळ वाढला आहे. या सर्कलजवळ चारही बाजुंनी वाहने येत असल्याने वाहनचालकांमध्ये चुकामुक होऊन अपघात होण्याचा वाढता धोका निर्माण झाला आहे.
गेल्या 29 डिसेंबरपासून सफा मशिद शापूर-कुर्टी दरम्यानचा चौपदरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा रस्ता खुला करण्यापूर्वी कदंब बसस्थानक व चिरपुटे भागात जाण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा अंडरपास रस्त्याची नितांत गरज होती. ही व्यवस्था न केल्याने फोंडय़ातील कदंब बसस्थानकाकडे जाणाऱया सर्व बसगाडय़ांना तीन किलो मिटरचा वळसा घालीत फर्मागुडी येथील जीव्हीएम कॉलेजजवळील सर्कलपर्यंत जाऊन पुन्हा कदंब बसस्थानकाकडे यावे लागते. त्यात प्रवाशांची व वाहनचालकांचीही मोठी गैरसोय होते. फोंडय़ातील वाहतूक कार्यालय कदंब बसस्थानकाला लागूनच आहे. वाहनांची नोंदणी, नवीन क्रमांकपट्टय़ा व इतर कामांसाठी येणाऱया नागरिकांनाही फर्मागुडीचा हा वळसा चुकत नाही. चिरपुटे भागातून फोंडा शहराकडे येणारे लोक व विद्यार्थ्यांनाही घरी परत जाताना हे द्रविडी प्राणायम करावे लागते.
वाहतूक नियंत्रण यंत्रणांची उणिव
सफा मशिद शापूर जंक्शनवरील धोका टाळण्यासाठी जो पर्याय सक्तीचा केलेला आहे, त्यामुळे जीव्हीएम सर्कलजवळ गोंधळ वाढला आहे. पणजीहून फोंडा, फोंडा ते पणजी आणि पणजीहून ढवळी बगलरस्ता अशा तीन दिशानी येणाऱया वाहनांना हे सर्कल लागते. आता फोंडा शहरातून कदंब बसस्थानक व चिरपुटेकडे जाणाऱया वाहनांच्या गर्दीची त्यात भर पडली आहे. त्यामुळे या सर्कलजवळ चारही बाजुंनी येणाऱया वाहनांचा गोंधळ उडतो. सकाळी, दुपारी व सायंकाळी वर्दळीच्यावेळी वाहनांच्या रांगा लागतात. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक किंवा इतर व्यवस्था नाही. जीव्हीएम कॉलेज, बीएड कॉलेज व उच्च माध्यमिकमध्ये येणाऱया विद्यार्थ्यांसह इतर सर्व वाहनचालकांना हे सर्कल आता धोकादायक बनून राहिले आहे. सर्कलमधील उद्यानातील झाडांमुळे कदंब बसस्थानकाकडे जाणाऱया दुचाकीचालकांना पणजीच्या बाजुने येणारी वाहने नजरेस पडत नाहीत. महामार्गावरुन वेगात येणारी प्रवासी वाहने व अवजड वाहनांमुळे छोटय़ा वाहनांना कायम धोका जाणवतो. सकाळी व सायंकाळच्यावेळी सर्वांनाच घाई लागलेली असताना वेगमर्यादेला आळा घालून सुरक्षितपणे सर्कल पार करण्याजोगी कुठलीच व्यवस्था नसल्याने हे ठिकाण अपघातप्रवण बनून राहिले आहे.