भाजप, काँग्रेस, मगो स्वबळावर लढणार
प्रतिनिधी/ पणजी
येत्या 15 मार्च रोजी राज्यात होणाऱया जिल्हा पंचायत निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस व मगो या तीन प्रमुख राजकीय पक्षांनी पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर अन्य एक स्थानिक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डने तूर्त या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा विचार चालविला आहे. तिरंगी लढतीमुळे या निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
काँग्रेस पक्ष प्रथमच ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढवित आहे. भाजपने 2015 मधील जि. पं. निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविली होती. त्यावेळी भाजपला त्याचा मोठा फटका बसला होता. 50 पैकी केवळ 19 जागा भाजपला मिळाल्या. मगो पक्षाचे त्यावेळी 6 उमेदवार निवडून आले होते. तब्बल 25 अपक्ष उमेदवार निवडून आले होते. यावेळीही भाजपने पुन्हा पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस व मगो हे दोन्ही पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपचा खरा सामना यावेळी या दोन्ही पक्षासोबत होणार आहे.
काँग्रेसची सावध खेळी
काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर लढवित आहे. त्यामुळे काँग्रेसने अंतर्गत चाचणीला सुरुवात केली आहे. नवे चेहरे समोर आणण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. सर्व 50 मतदारसंघामध्ये काँग्रेसने कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरु केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे सध्या विविध भागात फिरुन कार्यकर्त्यांसोबत चर्चा करीत आहे. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले बरेचजण काँग्रेसशी संपर्क साधून आहेत.
म्हादईचा प्रश्न ऐरणीवर येणार
यावेळच्या जि. पं. निवडणुकीत म्हादईचा मुद्दा आणि खाणबंदीचा विषय गाजणार आहे. त्याचबरोबर बेकारी आणि महागाई हे मुद्देही गाजण्याची शक्यता आहे. म्हादईचा विषय सध्या ज्वलंत विषय आहे. म्हादईच्या विषयावरुन गोव्याची फसवणूक झाल्याची भावना लोकांमध्ये आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वारंवार बदलेली भूमिका लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे म्हादईचा विषय कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. विरोधक हा मुद्दा तापविण्याची शक्यता आहे.
खाणबंदीचा विषय पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता
खाणबंदीचा विषय पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. मागील जि. पं. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला खाणपट्टय़ात फटाके वाजवून व पेढे वाटून उद्यापासून खाणी सुरु होणार असे सांगितले होते. त्याची आठवण पुन्हा ताजी होण्याची शक्यता आहे. खाणबंदीमुळे या भागातील जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे त्याचाही परिणाम बेकारी व महागाई यावरुनही मुद्यांचे राजकारण केले जाण्याची शक्यता आहे.
मगो पक्षामुळे भाजपला फटका बसणार?
भाजप आणि मगो युतीमुळे आजपर्यंत खऱया अर्थाने फायदा झाला तो भाजपचा. मगो पक्षानेच खऱया अर्थाने भाजपला सत्तेपर्यंत पोहोचविले. 1999 मध्ये पहिल्यांदा भाजप, मगो युती झाली. त्यावेळी भाजपचे केवळ चार आमदार होते तर मगोकडे 14 आमदारांचे संख्याबळ होते. गोव्याच्या राजकारणातील धुरंधर समजल्या जाणाऱया माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यवस्थितपणे राजकारण करीत 1999 च्या निवडणुकीत मगोच्या सहकार्याने 14 आमदार निवडून आणले तर मगो नेत्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून आली. मगोची एवढी मोठी घसरगुंडी झाली की मगो पक्ष 14 वरुन थेट 4 वर आला. तेव्हापासून आतापर्यंत मगो तीनचा आकडा पार करु शकला नाही. मगो पक्षाचे भाग्य काँग्रेसमुळे फळफळले तर भाजपच्या युतीने या पक्षाची धुळधाण झाली.