ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरुन उरते… या शिदोरीची सुरुवात मात्र शाळा स्तरापासूनच होते. यामुळे शालेय जीवन न विसरण्यासारखे आणि त्यातून पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासारखे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे याचा पुरस्कार करत अनेक शाळा स्थापन करण्यात आल्या. आज स्पर्धेच्या युगात तर त्या शाळांची संख्या वाढतानाच दिसते. मात्र विद्यार्थ्यांना ‘गुणात्मक शिक्षण, हेच आमचे ध्येय’ या ब्रीद वाक्मयाखाली सुरु असणारी सरकारी शाळा क्र. 41 ची वाटचाल आजच्या परिस्थितीत आदर्शच आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्यपूरक शिक्षण देण्यासाठी सदाशिवनगर येथील सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 41 चार दशकांपासून कार्यरत आहे. शाळेची स्थापना विद्यार्थ्यांना सदाशिवनगर परिसरात शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी 1973 साली शिक्षणप्रेमींच्या प्रयत्नातून करण्यात आली. शाळेच्या स्थापनेला 47 वर्षे पूर्ण झाली असून शाळा सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. प्रारंभी कनि÷ प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. मात्र पुढे शिक्षणाची गरज ओळखून उच्च प्राथमिक वर्गांची सुरुवात करण्यात आली.
1994 साली प्रथम 6 वीचा वर्ग काढण्यात आला तर पुढे 1995 साली इयत्ता सातवी सुरुवात झाली. यामुळे शाळेत आता इ. 1 ली ते 7 वीचे वर्ग चालविले जातात. शाळेची इमारत हे शाळेचे वैशिष्टय़ असून निसर्गरम्य प्रसन्न वातावरण आणि दुमजली प्रशस्त इमारत यामुळे विद्यार्थ्यांना हसतखेळत उपक्रमशील शिक्षण दिले जाते. 300 ते 350 च्या घरात पटसंख्या असलेल्या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. शिक्षण हे माणसाला जगण्याचा अर्थ शिकवते हीच भूमिका ठेवून कसे जगावे आणि यासाठी काय करावे याचे धडे शिक्षणातून दिले गेले.
मातृभाषेतून शिक्षणाचा पुरस्कार
बेलदार छावणी, नेहरुनगर, धामणे रांगी, बॉक्साईट रोड, सदाशिवनगर या भागातील गरजू, आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. मातृभाषेतून मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठीचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून होतो. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत मात्र शैक्षणिक व मानसिकदृष्टय़ा सक्षम बनविण्यासाठी सर्व व्यवस्था पुरवून शिक्षण दिले जाते. सध्या शाळेची पटसंख्या कमी झाली असून 70 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शिक्षकांचे प्रयत्न-समितीचे सहकार्य
आज शहरातील अनेक शाळांची पटसंख्या घटत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या घरोघरी भेटी देणे, शैक्षणिक साहित्य पुरविणे, विद्यार्थ्यांचा शोध घेणे, प्रवासासाठी हातभार लावणे, उपक्रमातून शिक्षण देणे यासाठी शिक्षकांचे प्रयत्न मोलाचे ठरतात. शाळेत चार शिक्षक कार्यरत असून मुख्याध्यापक म्हणून एल. एम. अवरोळी, आर. बी. बाळेकुंद्री, एम. बी. मुरगोड तर कन्नड शिक्षक म्हणून एम. आर. नाडीगेर हे शिक्षक कार्यरत आहेत. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून वैशाली मजुकर, उपाध्यक्ष राजश्री विभूते आणि सदस्यांचे सहकार्य लाभते. शाळेच्या प्रगतीसाठी पुढाकार घेतला जातो.
विकासात देणगीदारांची मदत
शाळेच्या प्रगतीत देणगीदारांची मोलाची मदत होते. शाळेचा परिसर सुंदर असल्याने प्रगतीच्या आणि विकासाच्या दृष्टीने संधी आहेत. नुकतेच शाळेचे रंगकाम करण्यात आले आहे. दुमजली इमारत, 7 वर्गखोल्या, पाण्याची व्यवस्था असून शाळेच्या समोरील बाजूला खुली जागा मैदान स्वरुपात वापरली जाते. शाळेच्या विकासात
डॉ. काळे यांची आर्थिक मदत, जैन महिला मंडळाचे शैक्षणिक साहित्य वितरण, माजी नगरसेविका सरला हेरेकर यांचा उपक्रमासाठी हातभार व इतर अनेकांची आर्थिक स्वरुपात तसेच उपक्रमाच्या माध्यमातून मदत होते. यामुळे विकासात देणगीदारांचा मोलाचा सहभाग दिसून येतो.
एल. एम. अवरोळी (मुख्याध्यापक)
शाळा सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. शाळेच्या प्रगतीत शिक्षकवृंद तसेच शाळा सुधारणा कमिटीचे मोठे सहकार्य आहे. पालक भेटी, विद्यार्थी शोधमोहीम यांच्या माध्यमातून शाळेची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचा प्रयत्न असतो. यासाठी देणगीदारांची मोलाची साथ लाभते.
राधिका सांबरेकर