तब्बल 274 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा फैलाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख रविवारीही कायम राहिला. नवे 505 रुग्ण बाधित झाल्याने देशभरातील रुग्णसंख्येचा आकडा 3 हजार 577 इतका झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात असून हा आकडा आता 690 इतका झाला आहे. शनिवारी रात्रीपासून 24 तासामध्ये 11 मृत झाले असून मृतांची संख्या 79 झाली आहे. 267 कोरोनाबाधित पूर्ण बरे झाले आहेत. जगातील 274 देशांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘तबलीग’मुळे 4 दिवसात रुग्ण संख्येत दुप्पट वाढ
देशात कोरोनाबाधितांची संख्या आता 4 दिवसात दुप्पट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत तबलीग जमातीच्या कार्यक्रमानंतर यामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. तबलिग जमातीचा कार्यक्रम झाला नसता तर 7.4 दिवसांमध्ये रुग्ण संख्या दुप्पट झाली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले. 21 राज्यांमध्ये तबलीग जमातीचे 1095 रूग्ण आहेत. देशातील बाधितांपैकी 30 टक्के रुग्ण हे तबलीग जमातीशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
27 हजार 661 निवारा शिबिरात 12.5 लाख नागरिकांचे वास्तव्य
लॉकडाऊननंतर आहे त्या ठिकाणी राहण्याचे नागरिकांना आदेश देण्यात आले. याचे सर्व राज्यांमध्ये पालन होत आहे. देशभरातील 27 हजार 661 निवारा शिबिरात 12.5 लाख स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्य आहे. यामध्ये 23 हजार 924 सरकारच्या तर तीन हजार 737 स्वयंसेवी संस्थांच्या छावण्या आहेत. अशी माहिती गृह सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी दिली. सर्व राज्यांमध्ये अत्यावश्यक वस्तू आणि सेवा उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱयांसह देशातील 75 लाखांहून अधिक नागरिकांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. तसेच 13.6 लाख कामगारांना संबंधित उद्योगांनी निवास आणि जेवणाची सोय केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘आयुष्मान’च्या माध्यमातून मोफत चाचणी
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) सूचना केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोनाचा फैलाव होतो, असे यामध्ये नमूद केले आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून सर्व सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये रुग्णांची मोफत चाचणी होणार असल्याचेही आरोग्य सचिवांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींची मनमोहन सिंग, सोनिया गांधीबरोबर चर्चा
कोरोनाचा एकजुटीने मुकाबला करूया, असे आवाहन करणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधी पक्षाचे नेत्यांशी याप्रश्नी संवाद साधला. त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, एस. जी. देवेगौडा, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांच्यासह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दलाचे अध्यक्ष व ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन, शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांच्याशी चर्चा केली. तुमच्याकडे कोरोनाविरोधात लढण्यासाठी काही उपाय असतील तर सांगावेत, असे आवाहनही त्यांनी संबंधित नेत्यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले.