देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या प्रशासकीय यंत्रणेने उचललेली कडक पावले जिल्हय़ात कोरोना रोखण्यास कारणीभूत ठरली आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनीही यासाठी विशेष लक्ष दिले आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्हय़ामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना सिंधुदुर्ग जिल्हय़ाने मात्र कोरोना रोखण्याचा पॅटर्न तयार केला आहे. सिंधुदुर्गात एकमेव कोरोनाबाधीत रुग्ण सापडला होता तोही आता कोरोनामुक्त झाल्याने एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे जिल्हय़ात 20 एप्रिलनंतर केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाऊनची शिथिलता आणली गेल्यास खबरदारीच्या उपाययोजना करून उद्योग आणि व्यवहार सुरू होऊ शकतात. 22 मार्चला देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या प्रशासकीय यंत्रणेने उचललेली कडक पावले या जिल्हय़ात कोरोना रोखण्यास प्रमुख कारणीभूत ठरली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनीही यासाठी विशेष लक्ष दिले आहे.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बढतीने जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दोन महिन्यातच कोरोना संकटाचा सामना त्यांना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या कसोटीचा हा काळ होता. परंतु जिल्हाधिकाऱयांनी न डगमगता अगदी संयमाने जिल्हय़ाची परिस्थिती हाताळली. अतिशय प्रभावीपणे त्यांनी काम केले. जिल्हाधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पोलिस विभाग, महसूल विभाग, सर्व नगरपालिका, ग्रामपंचायत, शासनाचे सर्व विभाग, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी समन्वय ठेवून टीमवर्क केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पहिल्या टप्प्यातच रोखण्यास यश मिळविले. एवढय़ावरच न थांबता कोरोना विरुद्धची लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई आपण जिंकू असा विश्वासही जिल्हाधिकाऱयांनी सर्वांना दिला. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रशासकीय यंत्रणा अगदी दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोनाचे संकट परतवण्यासाठी कामाला लागले आणि जिल्हय़ात कोरोना रोखण्यास यश मिळविले आहे. कोरोना रोखण्याचे काम करत असतानाच जिल्हय़ातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पोहोचण्याचे नियोजनही योग्य प्रकारे करण्यात आले. जिल्हय़ाबाहेरून कामानिमित्त आलेले कामगार यांनाही उपाशी राहू न देता निवारा केंद्र सुरू केली आणि त्यांच्यासाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूही सर्वांना पोच करण्याची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर गोवा राज्यात अडकलेल्या सिंधुदुर्गातील मुलांनाही जीवनावश्यक वस्तू प्रशासनामार्फत पोहोचविल्या. अशाप्रकारे उत्तम कामगिरी जिल्हाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यानंतर सर्वांच्याच मनात काहीशी भीती निर्माण झाली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणेने अतिशय संयमाने कोरोना रोखण्यासाठी काम केले. जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 25 जणांच्या टीमने अतिशय चोख कामगिरी बजावली तर दुसरीकडे कोरोना विषाणूचा शिरकाव जिल्हय़ात होऊ नये यासाठी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी प्रत्येक तालुक्यातील सहकाऱयांना घेऊन निभावत आहेत. त्यांना गावागावातील ग्रामपंचायत, सरपंच, पोलिस पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.
कायद्याबाबतचे प्रबोधन वेळोवेळी सहकाऱयांकडून करण्यात येऊन लॉकडाऊनची अंमलबजाणी करणे हे पोलिसांचे सूत्र यशस्वी ठरत आहे. गावोगावी जनजागृती त्यानंतर रूटमार्च काढण्यात आल्याने नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करण्यास सुरुवात केली. गोवा राज्यासह कर्नाटक व इतर जिल्हय़ातील काही लोक जिल्हय़ात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र सर्व बाजूंनी जिल्हय़ाच्या सीमा सील केल्याने जिल्हय़ाबाहेरून येणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यास यश आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर हे गावागावातील परिस्थितीचा आढावा दररोज घेऊन जिल्हाधिकाऱयांशी कायम समन्वय ठेवत आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, रोजच्या रोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत आणि कुणीही संशयित आढळल्यास किंवा जिल्हय़ाबाहेरून आलेली व्यक्ती असल्यास त्याची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोचवून त्या व्यक्तींना उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम चोखपणे पार पाडत आहेत.
प्रशासकीय यंत्रणेबरोबरच जिल्हय़ातील विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक सेवाभावी संस्था हेही प्रशासनाला सहकार्य करत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात दिलेली जबाबदारी प्रत्येकजण चोखपणे पार पाडत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गसारख्या जिल्हय़ामध्ये ज्या ठिकाणी पुणे-मुंबईवरून मोठय़ा प्रमाणात लोक येत असतात, परराज्यातून कामगार येत असतात, तर नजीकच असलेल्या गोवा राज्यात विदेशी पर्यटक येत असतात अशा परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हय़ाने कोरोना रोखण्याचे काम यशस्वीपणे आतापर्यंत पार पाडलेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हय़ाचा कोरोना रोखण्याचा पॅटर्न राज्यासाठी दिशा देणारा ठरू शकतो.
सिंधुदुर्गात आतापर्यंत कोरोना रोखण्यास यश आले असले तरी लॉकडाऊनचा काळ वाढविला गेल्यामुळे मुंबईतील चाकरमानी आपल्या गावाच्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने येऊ लागले असल्याने जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग निर्माण होण्याची चिंता मात्र वाढू शकते. यासाठी जिल्हा प्रशासनाला आपली कार्यकुशलता दाखवावी लागणार आहे.
सिंधुदुर्गनजीकच्या रत्नागिरी जिल्हय़ात मात्र कोरोनाचा विळखा काहीसा घट्ट होत चाललेला आहे. रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाची संख्या सहावर पोहोचली असून एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाचा विळखा वाढण्याचे संकट कायम आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही जिल्हय़ात अतिशय प्रभावीपणे काम केलेले आहे. त्यामुळे कोरोनाचा विळखा वाढत असला तरी तो रोखण्यासाठी ही यंत्रणा चांगले काम करत आहे. जिल्हाधिकारी प्रभावीपणे काम करत असताना मात्र जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून अपेक्षित काम होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक आणि कर्मचाऱयांमध्ये वादाचे प्रसंगही निर्माण झाले आहेत. या प्रकारांमुळे आरोग्य सेवेवर काही प्रमाणात परिणाम होऊन कोरोना रोखण्याच्या कामामध्येही काहीसा अडथळा ठरत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हाधिकाऱयांना आता अधिक कडक पावले उचलून कोरोना रोखण्याचे काम यशस्वीपणे करावे लागेल.
संदीप गावडे