प्रांताधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय : सम-विषय ऐवजी उजव्या अन् डाव्या बाजूची दुकाने उघडणार
दुचाकींना शहरात ‘नो एन्ट्री’
प्रतिनिधी / मालवण:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, लॉकडाऊनच्या या तिसऱया टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये उद्योग व्यवसायासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठही गुरुवार, 7 मेपासून सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बाजारपेठेत रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी, तर दुसऱया बाजूची दुकाने दुसऱया दिवशी खुली राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा दुकाने वगळता अन्य सर्व दुकानांसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. तसेच साम्नाजिक अंतर, अन्य खबरदारी आदी उपाययोजनाही बंधनकारक असणार आहेत. प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी आणि प्रशासन यांची ही बैठक झाली.
मालवण तहसील कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी जयंत जावडेकर तसेच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेटये, मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, अशोक सावंत, बाळू अंधारी, हर्षल बांदेकर, रवी तळाशीलकर, अजय शिंदे, मंदार ओरसकर, विनू पारकर यांच्यासह अन्य व्यापारी बैठकीस उपस्थित होते.
गावठी भाजीपाला विक्री सकाळी 11 पर्यंतच
शहरातील बाजारपेठ रस्त्यावर गावठी भाजीपाला विक्रीसाठी जे शेतकरी, ग्रामस्थ येतात, त्यांनी सकाळी 7 ते 11 या वेळेतच व्यवसाय करावा, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. बाजारपेठेत, दुकानांसमोर गर्दी होणार नाही, याची काळजी व्यापारी बांधवांनी घ्यावी, अन्यथा पालिका प्रशासनास कारवाई करणे भाग पडेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
दुचाकींना नो एन्ट्री
शहरात दुचाकींना परवानगी नाही मात्र ग्रामीण भागात दुचाकींना परवानगी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शहरात दुचाकीचे पास नाहीत, असे ग्राहक, व्यापारी अथवा दुकानातील कर्मचारी हे ग्रामीण भागातून मालवण बाजारपेठ येथे येत असतील, तर त्यांनी आपल्या दुचाकी कोळंब, आडारी, वायरी अथवा कुंभारमाठ हद्दीत ठेवाव्यात, असेही आवाहन करण्यात आले आहे. तंबाखू, गुटखा, सुपारी विक्री करणाऱया टपऱया बंदच राहणार आहेत. त्या बरोबर पान, तंबाखू, गुटखा, सुपारी खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई केली जाणार आहे, असेही प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले. रस्त्याच्या बाजूला असणाऱया वडापावच्या गाडय़ांनाही परवानगी देण्यात आलेली नाही.