प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. तिसरे लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू होईल, अशी आशा अनेक प्रवाशांना होती. रेल्वे सुरू झाल्यावर आपणाला गावी जाता येईल, अशी अपेक्षा होती. परंतु रेल्वे मंत्रालयाने 30 जूनपर्यंत सर्वसाधारण रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
कोरोनाचे संकट अधिक गडद होऊ लागल्याने लॉकडाऊन सुरू करण्यात आले. यामुळे संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली. देशातील रेल्वेसेवाही बंद करण्यात आली. बेळगावमधील अनेक प्रवासी हे इतर जिल्हे व राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना घरी परत येण्यासाठी सध्यातरी रेल्वे हा पर्याय आहे. त्यामुळे रेल्वे कधी सुरू होणार? याची प्रतीक्षा त्यांना लागून राहिली होती.
परंतु गुरुवारी रेल्वे मंत्रालयाने 30 जूनपर्यंत सर्वसाधारण रेल्वे बंद राहणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. या दरम्यान कोणतीही सर्वसाधारण रेल्वे धावणार नाही. केवळ मालवाहतूक, पार्सल व मजुरांसाठीची श्रमिक स्पेशल रेल्वे धावणार असल्याचे नैर्त्रुत्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी नागरिकांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.v