डॉ. परुळेकर यांचा नीतेश राणेंना सल्ला
पालकमंत्र्यांनी टेस्टसंदर्भात प्रस्ताव दिला हेता
मात्र, पडवे रुग्णालयातील शुल्क न परवडणारे
प्रतिनिधी / सावंतवाडी:
आमदार नीतेश राणे यांनी साथरोगाचे संकट असताना संयम ठेवणे गरजेचे आहे. नको तेथे राजकारण करण्याची ही वेळ नव्हे. हे भान लोकप्रतिनिधी म्हणून ठेवणे गरजेचे आहे, असे शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीदरम्यान (ज्या बैठकीला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते) पालकमंत्री उदय सामंत यांनी राजकारण बाजूला ठेवून स्वतःहून खासदार राणे यांच्याशी फोनवरून पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये कोविड टेस्ट सुविधा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. टेस्ट साठी लागणारे टेस्ट इक्वपिमेंट हे सरकारतर्फे देण्यात येणार होते. ज्याची किंमत लाखो रुपये आहे. असे असताना लाईफ टाईम हॉस्पिटलतर्फे प्रतिटेस्ट सांगण्यात आलेली फी, चार्जेस आजच्या परिस्थितीत शासनाला न परवडणारे होते. म्हणूनच पालकमंत्र्यांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सदर टेस्ट गोवा राज्यातून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
क्वारंटाईनबाबत सुधारित निर्णय
परराज्यातून किंवा परजिल्हय़ातून रेड झोनमधून येत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा निर्णय आधीच झालेला आहे. अशावेळी केलेल्या टेस्टचा रिपोर्ट किती तासात येतो, यापेक्षा त्याच दिवशी मिळेल हे महत्त्वाचे आहे. टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असलेल्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनऐवजी होम क्वारंटाईन करण्यात येऊ शकेल, असा आता सुधरित निर्णय आहे.
लवकरच सिंधुदुर्गात टेस्ट
गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ‘कोरोना’व्यतिरिक्त इतर आजारांनी अत्यवस्थ असलेल्या अनेक रुग्णांना गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासंदर्भात चर्चा केली. अशा रुग्णांना आता गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेणे सुलभ होणार आहे. तसेच नजीकच्या काळात अनेकांची टेस्ट एकत्र करण्याची (पूल टेस्टिंग) सोय पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्गात लवकरच सुरू होणार आहे.
पालकमंत्री साथरोग संकटकाळात जिल्हय़ातील जनतेच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न करत असताना राजकारण करणे हे सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी खरोखरच धोकादायक ठरू शकते, असे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.