प्रतिनिधी/ मेढा
सध्या कोरोनाच्या भितीमुळे सर्वजन भयभित असताना जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथील दळवी कुटुंबाने आपल्या पोटच्या मुलाच्या मृत्युची माहिती गांवकयांना न देता बंद घरात तब्बल चार दिवस सडलेल्या मृतदेहाबरोबर काढले. सदरचा मृत्यु नैसर्गिक कि घातपात? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. आणि जर नैसर्गिक मृत्यू असेल तर मृतदेह चार दिवस घरात ठेवण्याचे काय कारण? या प्रश्नांची उत्तरे दळवी कुटंबियच देवू शकतात. मात्र त्यांनी अद्याप पोलिसांना जुजबीच माहिती दिली आहे. शवविच्छदेन अहवाल आल्यावरच यामागील सत्य पुढे येणार आहे. दरम्यान, मयत युवकाचे आई, वडील व भावाला रायगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने सांगितली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये गावाकडे कधीच ना फिरकलेले जयवंत विठ्ठल दळवी हे कोरोना लॉकडाऊनमुळे 27 मार्चला आपली पत्नी व दोन मुलांसह म्हाते खुर्द (ता. जावली) या गांवी राहायला आले होते. अनेक वर्ष गावाकडे येणं-जाणं नसल्याने गावातील ग्रामस्थांशीही त्यांचा फारसा संपर्क नव्हता. नुकतीच म्हातेखुर्द गावाची दोन दिवसांपूर्वी कटेन्मेंट झोनमधून मुक्तता झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण सदरच्या प्रकारामुळे संपूर्ण गावासह प्रशासनही हडबडून गेले.
दुर्गंधी सुटल्याने प्रकार उघडकीस
दळवी यांच्या घराशेजारील ग्रामस्थांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी त्यांना बंद खोलीत अर्णव उर्फ विठू जयवंत दळवी (वय 16) हा मृतावस्थेत आढळला. मृतदेहामध्ये जंतू झाल्याने त्याची दूर्गंधी सुटली होती. ही घटना ग्रामस्थांपासून लपवून अशा मृतदेहाबरोबर वडिल जयवंत दळवी, आई व मोठा भाऊ गेले चार दिवस बंद घरात राहात होते. पण का? या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळाले नाही.
प्रशासनासह गावाचीही केली दिशाभूल
म्हाते खुर्द हे गांव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने आशा सेविका, अंगणवाडी सेविका अंगणवाडी, मदतनीस यांच्या सहकार्याने घर टू घर सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. दरम्यान, म्हाते खुर्द या गावातील मुबंईस्थित जयवंत दळवी याने व पत्नीने रोज घरभेट घेण्यासाठी येणाऱया आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका यांची दिशाभूल करून आपल्या आयर्न उर्फ विठु जयवंत दळवी हा मुलगा मतिमंद असल्याचे सांगितले जात होते. आम्हाला त्रास द्यायला परत येवू नका असेही बोलत असत. दिवसामागून दिवस जात होते. अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविका व वैद्यकीय लोक दारावर येवूनही त्या परिवराने या लोकांची दिशाभूल केली.
मतिमंद मुलगा इंग्लिश मिडियमला कसा?
आपला मुलगा मतिमंद आहे, त्याला काहीच होत नसल्याचे हे वडील व आई सांगतात. तर जर मुलगा 10 वी ला इंग्लिश मिडीयम शाळेत मुंबईला शिकत असेल तर तो मतीमंद कसा असाही प्रश्न निर्माण होतो. आणि चार दिवसांपूर्वी आपल्या घरांत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाला घेऊन परिवार गप्प का?
मृतदेह कुजून गेल्यावर वासाने गावकऱयांना माहिती झाल्यावर जन्मदाते आई बाप गावकऱयांना सांगतात की, मुलगा आज गेला तर वैद्यकीय अधिकारी म्हणतात हा सडलेले मृतदेह साठ तासापूर्वीचा असून याबाबतीत शासकीय शवविच्छेदन महत्त्वाचे असून याबाबत घटनास्थळी जावळीचे तहसीलदार शरद पाटील व पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकिय, वैद्यकिय, पोलीस यंत्रणा यांनी जावून मृतदेह त्याब्यात घेतला.
या घरामध्ये त्याचे आई-वडील व भाऊ राहत होते. दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू होऊनही या कुटुंबाने ही गोष्ट लपवून ठेवल्याची बाब उघडकीस आली. त्यामुळे ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला. त्यानंतर तातडीने प्रशासकिय व आरोग्य यंत्रणा पोहोचली. त्यांनी संबंधित मुलाचा मृतदेह तपासणीसाठी रविवारी रात्री उशिरा मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर रविवारी 17 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत गावासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासकिय यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली होती.
म्हाते येथील युवकाचा आढळलेला मृतदेह 24 तासापेक्षा जास्त 72 तासांपर्यंत झालेला असावा. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यात जंतू झाले होते. 24 तासापूर्वी मृत्यू झाल्याने नियमानुसार कोरोनाची टेस्ट घेता येत नाही. त्यामुळे सातारा ऐवजी मेढय़ात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जावली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते यांनी दिली.
या प्रकारासंदर्भात म्हाते खुर्द गावच्या सरपंच व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा विमल दळवी म्हणाल्या, संबंधित कुटुंब लॉकडाऊनमध्ये प्रथमच त्यांच्या जीवनात गावाला आले असून आमच्यासह आरोग्य कर्मचारी, आशा यांना माहिती देत नव्हते. मात्र, ग्रामस्थांना दुर्गंधी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. घडलेला हा प्रकार दुर्दैवी असून विचार करायला लावणारा आहे.
दरम्यान, संबधित कुटंबाबाबत पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई केली नसून शवविच्छेदन अहवाल आल्यावरच या घटनेच्या तपासाला गती येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे करत आहेत.