सावंतवाडी :
लॉकडाऊन कालावधीत मुंबई, पुणे व अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात येणाऱया चाकरमान्यांनी सोबत आधारकार्ड व रेशनकार्ड आणावे. एखाद्यावेळी गंभीर आजार व शस्त्रक्रिया उपचारादरम्यान या कार्डचा उपयोग शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ मिळण्यासाठी होऊ शकतो. गावातील नातेवाईकांनी आपल्या चाकरमान्यांना याची माहिती द्यावी, असे आवाहन जीवनरक्षा वैद्यकीय
प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी
प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.
गावात, आपल्या घरी अथवा संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल झाल्यानंतर अचानक गंभीर आजार, मोठय़ा शस्त्रक्रियेचा प्रसंग आल्यास शासनाच्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड व रेशन कार्डची गरज असते. शासनाने सर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे आधार कार्ड, रेशन कार्ड व अन्य ओळखपत्र सोबत आणावे, अशी सूचना नातेवाईकांनी करावी, असे आवाहन मसुरकर यांनी केले आहे.