चारजणांचा मृत्यू, मालमत्तेचे नुकसान, लाखो लोक सुरक्षित स्थळी
कोलकाता / वृत्तसंस्था
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ‘अम्फान’ ने पश्चिम बंगाल आणि ओडीशाच्या सागरतटीय भागाला तडाखा दिला आहे. यामुळे चार लोकांना प्राण गमवावे लागले असून स्थावर मालमत्तेचे बरेच नुकसान झाले आहे. मात्र केंद्र सरकार आणि या दोन्ही राज्यांची प्रशासने यांनी वेळीच पावले उचलल्याने अपरिमित हानी आतापर्यंत तरी टळली आहे. हे चक्रीवादळ 25 मे पर्यंत पूर्णतः शांत होईल, असे अनुमान पर्यावरण विभागाने व्यक्त केले आहे.
या वादळाने मंगळवारी रात्री उशीरा भारतीय भूमीत प्रवेश केला हाता. बुधवारी दुपारी 2 वाजून 30 मिनीवांच्या जवळपास त्याचा केंद्रबिंदू पश्चिम बंगालच्या दिघा आणि बांगला देशचे बेट हातिया यांच्या मध्यभागाच्या प्रदेशात आदळला. त्यामुळे हा प्रदेश 190 किलोमीटर वेगाच्या वाऱयाने हेलपाटून गेला. झाडे व काही इमारती कोसळल्या. त्याचप्रमाणे ओडीशाच्या चार जिल्हय़ांनाही फटका बसला. मात्र या दोन्ही राज्यांमधून साधारणतः 7 लाख लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हालविण्यात आले होते. त्यामुळे जीवीतहानी मर्यादित प्रमाणात झाली.
चार जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालच्या हावडा जिल्हय़ात वादळात सापडून एका महिलेचा मृत्यू झाला. चोवीस परगाणा जिल्हय़ाच्या मिनाखान भागात 1 महिला ठार झाली. या भागात बागायतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दोन व्यक्तींचा मृत्यू ओडीशात झाल्याचेही अनधिकृत वृत्त आहे.
आपत्तीनिवारण दलाची कामगिरी
केंद्र सरकारने मंगळवारीच दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या 40 तुकडय़ा पाठविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 20 तुकडय़ा वादळाचा जोर वाढण्याआधीच पोहचल्या असून त्यांनी आपत्तीनिवारणाचे कार्य सुरू केले आहे. वादळग्रस्त लोकांशी संपर्क करण्यात येत असून त्यांच्या आवश्यकतेनुसार साहाय्य पाठविले जात आहे. वादळामुळे अडकून पडलेल्यांची सुटका करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये 5 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हालविण्यात आले आहे. तर ओडीशात ही संख्या 1.58 लाख आहे. ही माहिती दलाचे प्रमुख अधिकारी एस. एन. प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अजस्त्र लाटांमुळे नुकसान
वाऱयाचा वेग प्रचंड असल्याने दोन्ही राज्यांमध्ये समुद्रात अजस्त्र लाटा उसळत आहेत. त्या तटावर आदळल्याने मोठे नुकसान होत आहे. भूभागात मोठय़ा प्रमाणात समुद्राचे पाणी शिरल्याने वादळ ओसरल्यानंतरही हानी टळणार नाही, असे तज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर दोन्ही राज्यांच्या एकंदर आठ जिल्हय़ांमध्ये प्रचंड पर्जन्य वृष्टी होत असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.
रस्त्यांची स्वच्छता त्वरित
वादळामुळे उन्मळून रस्त्यावर पडलेली झाडे तेथून हटविण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचे साहाय्य घेण्यात येत आहे. पावसाचा जोर ओसरताच ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे वाहतूक अधिक काळ ठप्प राहणार नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.
कोलकात्याचा धोका सौम्य झाला
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहर हे या वादळाच्या रेषेत होते. त्यामुळे शहराला मोठा धोका निर्माण झाल्याचे इशारे देण्यात आले होते. तथापि, भूभागात प्रवेश करण्यापूर्वी वादळाचा तीव्रता कमी झाल्याने मोठी संभाव्य हानी टळली आहे. येत्या चोवीस तासांमध्ये वादळ आणखी सौम्य होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बांगलादेशात अतिदक्षता
या वादळाचा तडाखा बांगलादेशलाही बसला आहे. त्यामुळे दक्षिण बांगला देशमधील काही ठिकाणी घरे व स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. काही प्रमाणात जीवीत हानी झाल्याचेही वृत्त आहे. 10 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालविण्याची व्यवस्था तेथील सरकारने केली आहे.
केद्रबिंदू तीस किलोमीटर व्यासाचा
या महावादळाचा केंद्रबिंदू (नेत्र) जवळपास 30 किलोमीटर व्यासाचा आहे. सर्वसाधारण वादळाचा केंद्रबिंदू 15 ते 20 किलोमीटर व्यासाचा असतो. यावरून या वादळाच्या तीव्रतेची कल्पना येते. पश्चिम बंगालने असे वादळ गेल्या दोन दशकांमध्ये 2 वेळा अनुभवले आहे. बांगला देशात अशी वादळे सातत्याने येतात, अशी माहिती भारतीय पर्जन्यमान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्र यांनी दिली. विभागाने आधीच वादळाची माहिती संबंधित राज्यांना दिली होती.
सज्जतेमुळे हानी मर्यादित
ड वादळाची दिशा अचूक ओळखल्यामुळे आधीच सज्जता ठेवणे झाले शक्य
ड 7 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हालविल्याने मोठय़ा प्रमाणात हानी टळली
ड दुपारी अडीच-संध्याकाळी साडेसात या कालावधीत वादळ पूर्णतः भूभागात
ड अम्फान या वादळाने बांगलादेशाही मोठे नुकसान, अनेक लोक झाले बेघर
ड 25 मे पर्यंत वादळ पूर्ण ओसरण्याची शक्यता पर्जन्य विभागाकडून व्यक्त