वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नव्या प्रकारच्या टाळेबंदीत अनेक प्रकारची दृश्ये दिसून येत आहेत. दिल्लीत दोन महिन्यांनी सार्वजनिक उद्याने खुली करण्यात आली आहेत. गुरुवारी लोक मॉर्निंग वॉक तसेच व्यायाम करताना दिसून आले आहेत. तर राजस्थानच्या पुष्करमध्ये बाजारपेठही खुली झाली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये गावी परतणाऱया मजुरांच्या चेहऱयावर आनंद दिसून आला आहे.
दिल्ली
दिल्लीतील सर्व उद्याने लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत. यात नेहरू पार्क, लोधी गार्डन, तालकटोरा उद्यानही सामील आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 3.30 वाजल्यापासून 6.30 वाजेपर्यंत उद्याने खुली राहणार आहेत.
राजस्थान
टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यात राजस्थानात जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. बिकानेर, पुष्कर आणि हनुमानगढ समवेत अन्य शहरांमध्ये बाजारपेठ सुरू झाली आहे. जयपूरमधील काही भागांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुष्करमध्येही बाजारपेठ खुली झाल्यावर विदेशी पर्यटक खरेदी करताना दिसून आले आहेत.
झारखंड
स्थलांतरित मजूर येण्याचे सत्र सुरूच आहे. झारखंडमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्याने इलेक्ट्रिक, मोटर पार्ट्स, स्टेशनरी, मोबाईल स्टोअर आणि सलून्स सुरू झाल्या आहेत.