बांधकाम क्षेत्रासह अनेक प्रकल्पांवर परिणाम
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात बांधकाम क्षेत्रासह अनेक क्षेत्रांमध्ये तसेच कंत्राटदाराकडे काम करणाऱया कामगारांनी आपल्या गावची वाट धरली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू व काश्मिर, महाराष्ट्र, कर्नाटक येथील कामगारांनी गोवा सोडून आपापल्या गावी जाणे पसंत केले. एकूण 43794 कामगारांना राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविले आहे.
आतापर्यंत 18 रेल्वे गाडय़ांतून या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहेत. मडगाव व करमळी रेल्वे स्थानकातून 4884 कामगारांना उत्तर प्रदेश या भागात पाठविण्यात आले. तर 4075 लोक गोव्यात आले आहेत. आतापर्यंत चार विमाने गोव्यात आली आहेत. या विमानातून खलाशांना गोव्यात आणले आहे.
विकासकामांवर होतोय परिणाम
अजूनही मोठय़ा संख्येने कामगार गोव्याबाहेर आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. हे कामगार गोव्याबाहेर गेल्याने गोव्यातील विकासकामावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. गोव्यातील विकास प्रकल्प व अन्य बांधकाम क्षेत्रात 95 टक्के कामगार हे बिगर गोमंतकीय आहेत. या कामागारांमुळेच गोव्याचे बांधकामक्षेत्र व सरकारी प्रकल्पांची उभारणी होत आहे. हे कामगार गावी गेल्यामुळे विकास कामांवर परिणाम होणार आहे.
कामगार परतण्याची शक्यता कमी
आता मोठय़ा संख्येने हे कामगार गोवा सोडून जात असल्याने त्याचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्र व सरकारी प्रकल्पावर होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतेक कंत्राटदार बिगर गोमंतकीय कामगारांना घेऊनच प्रकल्पांची कामे करतात. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या कामगारवर्गाने गावची वाट धरली आहे. हे कामगार आता परत कधी गोव्याकडे परतीतील हे सांगता यायचे नाही.
कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. पुढील काही काळ हा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिगर गोमंतकीय कामगार गोव्यात लवकर परतण्याची शक्यता कमी आहे. हे कामगार बांधकाम कामासह प्लंबिंग, वायरींगची कामे करतात. गोमंतकीय लोक बांधकाम क्षेत्रात काम करायला तयार नसतात. त्यामुळे ती जागा बिगर गोमंतकीय कामगारांनी घेतली आहे. अजूनही मोठय़ा प्रमाणात कामगार जाण्याच्या तयारीत आहेत.