प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे संपूर्ण जगच अडचणीत आहे. असे असले तरी कर्नाटक सरकारने त्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. असे असले तरी काही उद्योजक अचानकपणे उद्योग व्यवसाय बंद करत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून सरकारला कोणतीही पूर्व कल्पना न देता उद्योग बंद केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा साखर मंत्री आणि कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी दिला आहे.
कोरोनामुळे राज्यातील जनता मोठय़ा आर्थिक संकटात सापडली आहे. सरकारने विविध घटकांना पॅकेज जाहीर केले आहे. ते पॅकेज संबंधितांपर्यंत तातडीने पोहोचणे गरजेचे आहे. काम करणाऱया परवान्याची नकल न पाहता स्थानिक पातळीवर माहिती घेऊन त्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करा, अशी सक्त ताकीद साखर व कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांनी अधिकाऱयांना केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱयांना सुचना केल्या आहेत.
जिह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱयांची ऊस बिले 96 टक्के दिली आहेत. मात्र उर्वरित ऊस बिलेही तातडीने द्या, असे त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी हा सर्वात अधिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे प्रथम शेतकऱयाला मदत करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिने सर्व साखर कारखान्यांनी पाऊल उचलून त्यांना मदत करा, असे सांगितले. मलप्रभा साखर कारखान्याने शेतकऱयांची ऊस बिले दिली नाहीत. याबद्दल साखर मंत्र्यांनी अधिक दखल घेतली आणि त्या कारखान्याच्या व्यवस्थापकांना तातडीने ऊस बिले अदा करण्यास सांगितले.
जिह्यातील सर्व साखर कारखान्यांचा ऊस बिलाबाबत आढावा त्यांनी घेतला. यावेळी काही साखर कारखान्यांनी अजूनही शेतकऱयांची बिले देणे बाकी आहे. त्या सर्व साखर कारखान्यांना येत्या 15 दिवसांत ऊस बिले द्यावेत, असे सांगितले. असंघटीत कामगारांना काम नाही. त्यामुळे त्यांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक कामगाराला 5 हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सरकारकडे निधी उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्या कामगारांना ती रक्कम द्या, असे त्यांनी सांगितले. आतापर्यंत जवळपास 58 हजार कामगारांना रक्कम देण्यात आली आहे. अजूनही 20 हजार कामगारांना रक्कम देणे बाकी आहे. तेंव्हा त्यांनाही रक्कम देण्यासाठी पाऊल उचला, असे त्यांनी सांगितले.
सरकारने उद्योग व्यवसायांसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. आताही उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जनतेला काम उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी उद्योजकांनीही सहकार्य करवे, असे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक उद्योजकांनी सरकारला सर्व ती मदत केली आहे. यापुढेही करण्याचे आवाहन उद्योजकांनी दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी, खासदार आण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार अनिल बेनके, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र आदीउपस्थित होते.
अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई
कामावर जाताना तसेच काम करताना पडून मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. 5 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्द करण्यात आला. याचबरोबर जखमी झालेल्या तसेच नुकतेच लग्न झालेल्या कामगारांनाही मंत्री शिवराम हेब्बर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला.