पाटगाव/प्रतिनिधी
गेले चार ते पाच दिवस पावसाने ओढ दिल्याने पावसाअभावी शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक भागामध्ये पावसाने मोठी दडी मारल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात सर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता तद्नंतर अद्याप पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
एप्रिल-मे मध्ये झालेले समाधानकारक वळीव पाऊस व जूनच्या सुरुवातीस पावसाने लावलेली दमदार हजेरी यामुळे बऱ्याच अंशी शेतकरी वर्ग यावर्षी चांगल्या प्रमाणे पाऊस होईल या आशेवरती आनंदी होते,त्यातच निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीची कामे पूर्ण करून घेतली होती परंतु नेमके भात रोप लागवडीच्या वेळीच पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे.
दुबार पेरणी करणारेही अडचणीत
जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसून पेरलेले धान्य उगवलेच नाही असे बऱ्याच ठिकाणी घडले त्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी ची नामुष्की उद्भवली होती परंतु दुबार पेरणी करून देखील पावसाने ओढ दिल्याने पुन्हा पेरलेले धान्य देखील वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.