कोणत्याही विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात आज आषाढी एकादशी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. सांखळीच्या श्रीविठ्ठल मंदिर व्यवस्थापन समितीने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. कोणत्याही मंदिरात अभिषेक करायला दिला जाणार नाही, असाच निर्णय घेतला आहे.
गोव्यात मोठय़ा प्रमाणात विठ्ठलभक्त आहेत. वार्षिक पंढरीची वारी करणाऱयांची संख्याही वाढलेली आहे. कोरोनामुळे यावर्षी पंढरीची वारी रद्द झालेली आहे. शिवाय राज्यातील विठ्ठल मंदिरातील व्यवस्थापकांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये आज देवस्थान समितीतर्फे एकच महाअभिषेक होईल. इतर कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही.
प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱया सांखळीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आज राज्यभरातील मंडळी विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. सांखळीत एकादशी ते त्रयोदशी असे तीन दिवस कार्यक्रम होतात. त्रयोदशीदिनी चिखलकाला होतो. यावर्षी समितीने हे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आज सकाळी देवस्थान समितीतर्फे प्रतापसिंह राणे हे स्वतः महाअभिषेक करतील. त्यानंतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत. कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन हा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. राज्यातील सर्व विठ्ठल मंदिरात आज कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. घरी बसूनच श्रीविठ्ठलाची सेवा करा, असे आवाहन राज्यातील सर्व विठ्ठल मंदिर संस्थांनानी केले आहे.