प्रतिनिधी/ संकेश्वर
जिल्हय़ाच्या केंद्र ठिकाणासह शहरे व ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वाढला आहे. 31 मे पर्यंत कोरोना नियंत्रणाखाली आला होता. पण जून ते 16 जुलै अखेरपर्यंत रुग्णांच्या संख्येत हजारोने वाढ झाली. जिह्यात उपचारासाठी दाखल होत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांवर एचö1 एन-1 वरील औषधांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी दिली.
डॉ मुन्याळ पुढे म्हणाले, कर्नाटकात कोरोना सक्रिय होताच रोगाच्या मूळ लक्षणाचा वैद्यकिय पद्धतीने विचार केला गेला. यावरुन एच-1 एन-1 यावरील औषधांचा उपयोग करण्यासह टॉनिकच्या गोळय़ा, बी-कॉम्लेक्स अशा औषधांचा वापर करुन उपचार करण्याचे निश्चीत केले. मार्चपासून जवळपास 5 महिने या औषधांवरच रुग्णांना कोरोनापासून मुक्त करण्यात आरोग्य खाते यशस्वी होत आहे. तथापि रुग्णांना या उपचारासह फळे, सकस आहारही दिला जातो. शिवाय नियमीत गरम पाण्याचे सेवन करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाण्यात मीठ घालून त्याच्या गुळण्या करणे या पद्धतीने प्रत्येक रुग्णाची काळजी घेतल्यास कोरोनावर मात करण्यास वेळ लागणार नाही. कोरोनाबद्दलची भीती प्रत्येकाने आपल्या मनातून काढायला हवी, असे त्यांनी सांगितले.
समुह संसर्गाचा धोका वाढला
8 जूननंतर लॉकडाऊन खुले झाल्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली. शिवाय आरोग्य सुरक्षित ठेवण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये कोरोना रुग्णांचा स्फोट झाल्याचे पहावयास मिळत आहे. याशिवाय मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. लोकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने जिह्यामध्ये कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. आजतागायत बळी गेलेल्यांमध्ये 70 ते 80 वयोगटातील वृद्ध, मधूमेह रुग्ण, हृदयरोगाचे रुग्ण, एड्स रुग्णांसह 10 वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश आहे. या वर्गामध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना पर्याय नाही. त्यामुळेच अशा वयोवृद्ध, बालक, गरोदर महिलांना व रुग्णांना सुरक्षितता लाभणे महत्वाचे आहे.
तालुका पातळीवर कोव्हीड-19 उपचार केंद्र
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन या रुग्णांवर तातडीचे उपचार व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्यात कोव्हीड-19 उपचार केंद्र उभारुन त्या केंद्रात 30 बेडस्ची सोय केली जाणार आहे. प्रत्येक केंद्रात ऑक्सिजनसह आयसोलेशनच्या सुविधा ठेवल्या जाणार आहेत. प्रथम टप्प्यातील रुग्णांना याठिकाणी दाखल करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.