पालकमंत्र्यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या संरक्षक भिंत कोसळलेल्या कामाची चौकशी समिती नेमली असली तरी खऱया अर्थाने केंद्रीय स्तरावरून महामार्गाच्या निकृष्ठ कामाची चौकशी व्हायला हवी. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या निकृष्ठ कामाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दर्जेदार होत नसल्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. परंतु महामार्ग प्राधिकरणकडून किंवा लोकप्रतिनिधींकडूनही गंभीर दखल घेतली गेली नाही. मात्र सिंधुदुर्ग जिल्हय़ात कणकवली येथे बॉक्सवेलची भिंत कोसळल्यानंतर निकृष्ठ कामाचे पितळच उघडे पडले आहे. काँक्रीटीकरणाच्या या महामार्गावर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे शंभर वर्षाची खात्री देणाऱया रस्ता सुरक्षेलाच आता तडा गेला आहे.
तीन वर्षापूर्वी जेव्हा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हा कोकणवासियांना आनंद झाला होता. मागील अनेक वर्षात अपघातात हजारो बळी घेणारा हा महामार्ग चौपदरीकरणानंतर निर्धोक होईल असा विश्वास जनतेच्या मनात होता. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम शंभर वर्षे काय दोनशे वर्षेही टिकेल असा अतिआत्मविश्वास नेत्यांनी व्यक्त केला होता. परंतु आता महामार्गाचे काम निकृष्ठ झाल्याचे उघड झाल्यानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण महामार्गाच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. परंतु या समितीने नुकतीच पाहणी केली असून त्यावेळी ठरावीक पुलांचीच पाहणी केली आहे. त्यामुळे एकप्रकारे चौकशीचा फार्स तर केला जात नाही ना अशी शंका जनतेच्या मनात येऊ लागली आहे. त्यामुळे महामार्गाचा खऱया अर्थाने दर्जा तपासायचा असेल तर उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून ‘क्वालिटी कंट्रोल’मार्फत तपासणी व्हायला हवी.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम तीन वर्षापासून सुरू आहे. रायगड, रत्नागिरी जिल्हय़ाच्या तुलनेत सिंधुदुर्गात कामाला वेग आल्याने जनतेने समाधान व्यक्त केले होते. खारेपाटणपासून झारापपर्यंत 85 कि.मी.च्या टप्प्यात अनेक छोटे-मोठे पूल बांधण्यात आले. अनेक ठिकाणी अंडरपाससाठी बॉक्सवेल तयार करण्यात आले आहेत. बहुतांशी रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र हे काम होत असताना या कामातील निकृष्ठपणा जनतेने सातत्याने दाखवून दिला होता, रस्त्याचे काँक्रिटीकरण होत असताना काही ठिकाणी तडे गेले होते. त्याला तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मुख्य रस्त्याच्या बाजूचे सर्व्हिस रोड ठिकठिकाणी खचले आहेत. गटारांची कामे निकृष्ठ करण्यात आली आहेत.
ब्रिटीशकालीन पुलांची व रस्त्यांची कामे पाहिल्यास शंभर वर्षानंतर आजही मजबूत आहेत आणि शंभर वर्षे पूर्ण झालेल्या पुलांची दखल घेण्यासाठी ब्रिटीश सरकारकडून पत्रेही आहेत. परंतु सद्याच्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्याअगोदरच बांधकाम ढासळू लागले आहे. पूर्वी ब्रिटीशांनी पाण्याचा अंदाज घेऊन त्या-त्या ठिकाणच्या नाल्यावर मोऱया बांधल्या होत्या. मात्र मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱया दिलीप बिल्डकॉन कंपनीने पाण्याचा अंदाज न घेता अरुंद मोऱया बांधल्या व शेतात पाणी सोडून दिले. परिणामी शेकडो हेक्टर भातशेती माती आणि दगड धोंडय़ांनी गाडली गेली.
महामार्गाच्या एकूण काँक्रिटीकरणापासून ते शहरातील सर्व्हिस रोड, गटार, बॉक्सेल ब्रिज याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व देखरेख करणाऱया आरटी फॅक्ट कंपनीकडून करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे दर्जाहीन काम कोकणवासियांच्या नशिबी आले आहे. बॉक्सेल ब्रिजपासून सर्व्हिस रोड गटारांच्या कामात तातडीने सुधारणा करण्याबरोबरच दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत पाऊल उचलणे गरजेचे आहे. तसेच जबाबदार लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा वापर करत याबाबत आवाज उठवणेही तेवढेच गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात कोकणवासियांचा हा दर्जाहीन रस्ता कायमस्वरुपी नशिबी येणार आहे. चौपदरीकरणाचे काम दर्जेदार होत नसेल तर हजारो कोटी पाण्यातच गेल्यासारखे होईल.
महामार्गाचे काम, काँक्रिटीकरणाचे काम सर्वत्र करताना येथील मुसळधार पावसाचा विचार केला नाही. भर पावसात कामे केली गेली. त्यामुळे काँक्रिटच्या रस्त्याला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत, रस्त्याला लेव्हलही नाही. पुणे-मेंगलोर चौपदरीकरणाचे काम पहा किंवा दिल्ली-आग्रा राष्ट्रीय महामार्ग पहा. महामार्गाचे काम अतिशय दर्जेदार झालेले आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ठ झाले आहे हे आता उघडच झाले आहे. या कामाबाबत अनेक तक्रारी झाल्या त्यावेळी दखल घेतली नाही. मात्र कणकवलीमधील उड्डाण पुलाची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर दखल घेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्याच खात्यांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ लोणेरचे प्रा. डॉ. सचिन पोरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. पालकमंत्र्यांनी महामार्गाच्या संरक्षक भिंत कोसळलेल्या कामाची चौकशी समिती नेमली असली तरी खऱया अर्थाने केंद्रीय स्तरावरून महामार्गाच्या निकृष्ठ कामाची चौकशी व्हायला हवी. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या निकृष्ठ कामाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. सन 2016 मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरच रायगड जिल्हय़ात महाडच्या सावित्री नदीवरील पुल पुरामध्ये व्हावून गेल्याची भिषण दुर्घटना घडली. यामध्ये दोन एसटी बस व्हावून गेल्या होत्या अशा प्रकारच्या भीषण दुर्घटना घडू नये यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून क्वालिटी कंट्रोल कडून स्ट्रक्चरल ऑडीट व्हायला हवे आणि झालेल्या चुका सुधारून दर्जेदार काम केल्यास मुंबई-गोवा महामार्गावरून निर्धेकपणे जाता येईल.