4 पैकी 3 छावण्याच शिल्लक : बडी छावणी झाली छोटी
5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर उभारणीकरता भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे अयोध्येत पुन्हा एकदा कडेकोट बंदोबस्त ठेवला जात आहे. मोठय़ा संख्येत सुरक्षा दल तेनात करण्यात आले असून सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिसांचे बॅरिकेडिंग आहे. म्हणजेच एकदा अयोध्या छावणीत रुपांतरित होणार आहे. परंतु अयोध्येत अनेक छावण्या कित्येक वर्षांपासून तेथे साधू-संत राहत आले आहेत. या छावण्यांनी अयोध्येतील मंदिरउभारणीचा लढा सुरू ठेवण्यात मोठा वाटा उचलला आहे.
या छावण्यांचा इतिहास भारतात मुगल राजवट कमकुवत होण्यापासून सुरू होतो. परंतु याचा कुठलाच लेखी इतिहास उपलब्ध नाही, पण, वैरागी साधूंनी धर्माच्या रक्षणासाठी अयोध्येत एकत्र येत राहण्यास प्रारंभ केला आहे. या साधूंच्या एकत्रित वास्तव्यामुळे इंग्रजांच्या काळात त्यांच्या राहण्याच्या जागेला छावणी म्हटले जाऊ लागले.
काही काळापूर्वीपर्यंत अयोध्येत 4 प्रमुख छावण्या होत्या, तुलसी दास यांची छावणी, बडी छावणी, तपसीजींची छावणी आणि छोटी छावणी. परंतु तुलसी दासजींची छावणी आता अस्तित्वात नाही. यामागील स्पष्ट कारण कुणीच सांगत नाही, परंतु त्या छावणीत संतांचे येणे-जाणे बंद आणि हळूहळू त्याचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. उर्वरित 3 छावण्या आजही मुक्तपणे कार्यरत आहेत.
छोटी छावणी
सद्यकाळात अयोध्येतील सर्वात महत्त्वपूर्ण हीच छावणी आहे. उर्वरित सर्व छावण्यांच्या तुलनेत येथे लोकांचा वावर अधिक दिसून येतो. सीआरपीएफचे 4 जवान सुरक्षेकरता तेथे तैनात असतात. या छावणीचे वर्तमान महंत नृत्यगोपालदास आहेत. राम मंदिर आंदोलनाचे महत्त्वाचे नेते राहिलेले महंत नृत्य गोपालदास अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर उभारणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या छावणीला छोटी छावणी या नावानेच अयोध्येत ओळखले जातात. परंतु काही वर्षांपूर्वी याचे नाव बदलून श्री मणिराम दास छावणी करण्यात आली होती. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येणार असल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे. छोटी छावणी म्हणजेच श्री मणिराम दास छावणीतील घडामोडींना वेग आला आहे. अयोध्येच्या सर्व छावण्यांमध्ये आज या छावणीचा प्रभाव सर्वाधिक आहे. तपसीजींची (तपस्वी) छावणी
अयोध्या शहराच्या रामघाट भागात ही छावणी आहे. भव्य इमारत आणि इमारतीवरील कलाकुसर पाहता छावणी फार पूर्वीपासून सुस्थितीत असल्याचे जाणवते. छावणीच्या बाहेर पोलिसांचा पहारा असतो. ही छावणी जंगल आणि डोंगरांवर तपस्या करणाऱया साधू-संन्याश्यांसाठी तयार करविण्यात आली होती. हे साधू-संत फिरत-फिरत अयोध्येत आल्यावर त्यांच्या वास्तव्य आणि दिनक्रमाचे पालन करण्यास अडचणी यायच्या. याचाच विचार करत ही छावणी निर्माण करण्यात आली होती. अयोध्येत सर्वात प्राचीन पीठ आणि सर्वात सिद्ध पीठ तपसीजींची छावणी असल्याचे बोलले जाते.
बडी छावणी
मुख्य अयोध्या शहरापासून दूर एका काठावर सुमारे 3 एकर जमिनीवर ही छावणी आहे. चौतर्फा भिंत असून ये-जा करण्यासाठी एकच दरवाजा आहे. छावणीच्या मधोमध एक मंदिर असून चारही बाजूला छोटय़ाछोटय़ा खोल्या निर्माण करण्यात आल्या आहेत. एका बाजूच्या खोऱयांवर साधू निवास लिहिले आहे. तर दुसऱया बाजूच्या खोल्यांच्या दरवाजावर विविध लोकांची नावे आणि त्यांची जन्मठिकाणे नमूद आहेत. बडी छावणीत एका बाजूला संत राहतात, त्यांचा दिनक्रम वेगळा असतो. तर एकीकडे भक्तांचे वास्तव्य असून ते स्वतःच्या मर्जीनुसार राहतात. भक्तांना संतांमुळे आणि संतांना भक्तांमुळे कुठलाच त्रास होऊ नये याकरता ही व्यवस्था असल्याचे समजते.
देणगीची ऑनलाईन प्रक्रिया
एसबीआयने दिली माहिती
अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला ऑनलाईन देणगी देण्याची पद्धत स्टेट बँक ऑफ इंडियाने विशद केली आहे. या प्रकियेद्वारे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला ऑनलाईन देणगी देत त्याची पावतीही प्राप्त करता येणार आहे. कुठल्याही बँकेत खाते असले तरीही संबंधित रक्कम हस्तांतरित करता येणार आहे. राम मंदिर उभारणी आणि त्याच्या संचालनासाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे.
ऑनलाईनएसबीआय डॉट कॉमवर लॉग इन केल्यावर स्टेट बँक कलेक्टचा पर्याय निवडावा लागणार आहे. यावर क्लिक करताच प्रोसिडचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यावर क्लिक करण्यापूर्वी संबंधिताला अटी मान्य केल्याच्या बॉक्सवर क्लिक करावा लागेल. त्यानंतर स्टेट ऑफ कॉर्पोरेट/इन्स्टीटय़ूशन आणि टाइप ऑफ कॉर्पोरेट/इन्स्टीटय़ूशनचा पर्याय समोर येणार आहे. उपलब्ध पर्यायात उत्तरप्रदेश आणि त्याखालील रिलिजियस इन्स्टीटय़ूशनला निवडून क्लिक करावा लागणार आहे.
पंतप्रधान ओली यांचे विधान चुकीचे, अयोध्येसंबंधी विधानामुळे फजिती
नेपाळ कम्युनिस्ट पक्षात विरोधाला तोंड देणारे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे वरिष्ठ नेते नारायणकाजी श्रेष्ठा यांनी ओली यांच्या भारत तसेच अयोध्यासंबंधीच्या विधानावर टीका करत त्याला चुकीचे ठरविले आहे. ओली यांच्या विधानामुळे भारत आणि नेपाळचे संबंध बिघडू शकतात असे श्रेष्ठा यांनी म्हटले आहे. श्रेष्ठा हे पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सचिव असण्यासह पक्षाचे प्रवक्तेही आहेत.
ओली यांनी काही दिवसांपूर्वी भगवान रामाचे जन्मस्थळ नेपाळच्या बीरगंज जिल्हय़ाच्या थोरीमध्ये असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या विधानावर रामभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.
उमा भारती, जयभान यांनाही निमंत्रण
अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी भगवान श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ात मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि मंत्री जयभान सिंग पवैया सामील होणार आहेत. दोघांनाही रामजन्मभूमी न्यासाने भूमिपूजन कार्यक्रमात सामील होण्याचे निर्देश दिला आहे. दोन्ही नेते रामजन्मभूमी आंदोलनाशी दीर्घकाळ संलग्न राहिले आहेत. 4 ऑगस्टच्या संध्याकाळपर्यंत अयोध्येत पोहोचा आणि 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत थांबा असे न्यासाकडून या नेत्यांना सांगण्यात आले आहे. उमा भारती यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
उमा भारती रामजन्मभूमी आंदोलनाच्या प्रमुख नेत्या राहिल्या आहेत. तर जयभान सिंग पवैया हे मुख्य आंदोलकासह बजरंग दलाचे तत्कालीन अध्यक्ष राहिले आहेत. पवैया आणि उमा भारती यांच्यावर अद्याप बाबरी मशिद पाडण्यासाठी लोकांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. जुलै महिन्यात दोन्ही नेत्यांनी स्वतःचे म्हणणे नोंदविण्यासाठी लखनौचा दौरा केला होता.
माझेच नव्हे तर पूर्ण देशाचे स्वप्न साकार होणार आहे. 500 वर्षांनी आम्ही इतिहास बदलताना पाहणार आहोत. आंदोलनादरम्यान ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ अशी घोषणा द्यायचो, ही घोषणा आता पूर्ण होणार आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी व्यासपीठावर अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, विजयाराजे सिंधिया, महंत नृत्यगोपालदास महाराज, आचार्य धर्मेंद्रजी, अवेध्यानंद महाराज, साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा उपस्थित होते असे पवैया यांनी सांगितले आहे.
कारसेवकांवर गोळय़ा न झाडणारा अधिकारी
कुशभवनपूरला (सुल्तानपूर) कुशाची नगरी म्हटले जाते. भगवान श्रीरामच्या नगरीशी याचे विशेष कनेक्शन आहे. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या उभारणीला प्रारंभ होणार असल्याने येथील लोकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. या उत्साही लोकांमध्ये माजी खासदार तसेच आयपीएस डीबी राय यांचे कुटुंबही सामील आहे. उत्तरप्रदेशच्या तत्कालीन मुलायम सिंग यादव सरकारच्या काळात राय हे अयोध्येचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. निशस्त्र कारसेवकांवर मुलायम सिंग यांनी गोळय़ा झाडण्याचे निर्देश दिले होते. परंतु राय यांनी याला नकार दिला होता. आदेश डावलल्याने राय यांना स्वतःची नोकरी गमवावी लागली होती.
राय यांनी अयोध्येतील 6 डिसेंबरच्या घटनेचे सत्य जनतेसमोर आणण्यासाठी एक पुस्तक लिहिले आहे. 2008 मध्ये प्रकाशित झालेले हे पुस्तक चर्चेत राहिले होत. भगवान श्रीरामाबद्दल वडिलांना असणारी श्रद्धा आमच्याही ठायी आहे. 1992 च्या अयोध्या कारसेवेत वडिलांनी कारसेवकांवर गोळय़ा चालविल्या नव्हत्या. याच कारणामुळे त्यांना निलंबित व्हावे लागले होते. निलंबनानंतर न्यायालयात सीबीआयला आरोपपत्र दाखल करता आले नव्हते. अशा स्थितीत 6 महिन्यांनी त्यांचे निलंबन रद्द झाले. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायम सिंग यादवांना त्यांनी सोपविलेला राजीनामा मंजूर झाला नव्हता. या कारणामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेत 1996 मध्ये राजीनामा मंजूर करण्यास भाग पाडले होते. परंतु त्यांचे वेतन आणि निवृत्तिवेतन रोखण्यात आले होती अशी माहिती राय यांचे पुत्र पुनीत यांनी दिली आहे.
25 वर्षांपर्यंत गणवेश परिधान करून लोकांच्या सुरक्षेत राहिलेले आयपीएस डी.बी. राय यांनी पुढील आयुष्यात राजकारणात पाऊल ठेवले होते. भाजपच्या तिकिटावर सुल्तानपूर मतदारसंघातून दोनवेळा ते लोकसभेवर गेले होते. मतदारसंघातून दोनवेळा निवडून येणारे ते एकमात्र खासदार ठरले होते. 2009 मध्ये वयाच्या 64 व्या वर्षी राय यांचे निधन झाले.