सातारा / प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील वनगळ येथील शेतकऱ्यांचे नुकसान थांबवा, अन्यथा धोम धरण व्यवस्थापन कार्यालयाच्या समोर आंदोलन छेडू असा इशारा रिपब्लिकन सेनेच्यावतीने धोम धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा तालुक्यातील वनगळ येथील मायनर(कॅनाॅल) मध्ये होणाऱ्या जास्त पाण्याच्या विसर्गामुळे गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या नुकसानीबाबत येथील शेतकऱ्यांनी अनेकदा याबाबतचे निवेदन दिले आहे. अनेकदा शाखा अभियंता यांना भेटून हा प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खूप प्रयत्न झाले आहेत. असे असताना सुद्धा हा प्रश्न आजवर मार्गी लागू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तसेच सुरू आहे. एकीकडे या प्रश्नासाठी हेलपाटे मारून कार्यालयाचे उंबरठे झिजवून सुद्धा प्रशासनाला काहीच फरक पडला नाही. उलट यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या वतीने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. जादा पाण्याचा विसर्ग यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी अशी सूचना केली आहे की जादा पाण्याचा विसर्ग वळवून रस्त्यालगत असणार्या चारीद्वारे ओढ्यामध्ये सोडण्यात यावे. हा प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास रिपब्लिकन सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे, असा इशारा दिला.
निवेदन देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले यांच्यासह वनगळ येथील शेतकरी सुनील पाटील, रामदास साळुंखे, मिलिंद गाडे, विक्रम साळुंखे, सिध्दार्थ भोसले, अरविंद भोसले हे उपस्थित होते