पुलाची शिरोली / वार्ताहर
महाराष्ट्र शासनाने आर्त हाक आमच्या शिक्षक बांधवांची ऐकून कायम विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान दयावे अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी प्रसिध्दी पत्रकारद्वारे केली आहे.
कायम विनाअनुदानित शाळातील आमचे शिक्षक बांधव गेली 20 वर्षे आपल्या हक्कासाठी शासनाच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देत आहेत.गेली 20 वर्षे ज्ञान दानाचे पवित्र काम अखंड आणि अव्याहतपणे करीत आहेत.भारताचे सुजाण नागरिक घडवण्याचे काम ईमाने इतबारे करींत आहेत. हे सगळं विनावेतन केले.
कुटुंबाचा चरिताथ॔ चालवण्यासाठी दिवसभर शाळेत काम करून रात्री मिळेल तो व्यवसाय केला. तरीही या यातना सोसूनही शासनाने वेतन दिले नाही. त्यामुळे निराश होऊन कांही शिक्षक सेवकानी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली.जवळपास १६० पेक्षा जास्त आंदोलने केली. तेव्हा कोठे 20% अनुदान दिले.आता या सर्व घोषीत अघोषीत शाळा शंभर टक्के अनुदानावर यायला पाहीजेत. पण तसे झाले नाही.आतापर्यंत कोणी उपोषणे केली , कोणी अनवाणी फिरताहेत विविध मार्गानी आंदोलन केली.
नाइलाजाने कोल्हापूर — सांगली पासून बारामती पर्यंत पायी दिंडी १ सप्टेंबर 2020 पासून अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे यांच्या पुढाकाराने सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने आमच्या बांधवांची ही आर्त हाक आता तरी ऐकावी.आणि शंभर टक्के अनुदान घोषित करावे. अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.