खोची / प्रतिनिधी
ग्रामीण भागातील पशुधन पालकांना सध्या पशुखाद्याच्या बाबतीत मोठ्या संकटातून जावे लागत आहे. कारण खाद्य एका कंपनीचे, पोते एका कंपनीचे व बिल एका कंपनीचे असे प्रकार होत आहेत. महिन्यापूर्वी येवून गेलेल्या महापूरामूळे नदीकाठच्या गवती कुरणे,जनावरांचा चारा पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या वैरणीची कमतरता मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अशावेळी पशुखाद्यांच्या माध्यमातून पशुपालकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
ग्रामीण भागात शेतकरी वर्गाकडून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुधन पालन हा जोडधंदा मोठ्या प्रमाणात केला जातो.पशुधन पालनापासून शेतकरी दूध व शेतीसाठी शेणखत या गोष्टी प्रामुख्याने मिळवतो.शेतकरी पशुधन पालन व्यवसायासाठी प्रामुख्याने जनावरांना ओला चारा व सरकी पेंड,गहू भुसा,आट्टा,सुग्रास,गोळी पेंड आदी प्रकारचे खाद्य प्रामुख्याने वापरतो. जर जनावरांसाठी सरकी पेंड सह अन्य खाद्य वापरले नाही. तर जनावराच्या दूध देण्याच्या पातळीवर मोठा परिणाम होतो. म्हणून बळीराजा खाद्य प्रामुख्याने वापरतो.
पण सध्या ग्रामीण भागात पशुखाद्य विक्रेते, दूध संस्था, अन्य व्यापारी यांच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे पशुखाद्य सरकी पेंड ४३ किलोचे पोते १०५० ते बाराशे रुपये (पूर्वी ४५ किलोचे पोते असायचे.सध्या ४० ते ४३ किलोचे पोते असते.) या दराने विकले जात आहे.त्यामध्ये अनेक कंपन्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये काही कंपन्या उच्च दर्जाच्या आहेत. त्यांचे खाद्य पण उत्कृष्ट आहे.त्यामुळे त्यांचा दर अधिक आहे.
पण याचाच फायदा घेऊन काही सरकी पेंड खाद्य कंपन्या सरकी पेंड एका कंपनीची,पोते दुसऱ्या कंपनीचे भरून बिल उच्च दर्जाच्या कंपनीचे आकारत आहेत.त्यामुळे पशुधन पालकांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. कारण सदर पोत्यामध्ये असलेले सरकी पेंड खाद्य हे दुय्यम दर्जाचे आहे. त्यामुळे जनावरे दूध कमी प्रमाणात देतात.त्यामुळे शेतकरी वर्गाचे नुकसान होत आहे.तरी सरकी पेंड खाद्य कंपनीने याची दखल घेऊन ज्या कंपनीचे खाद्य त्याच कंपनीचा दर घ्यावा व पशु पालकांची लूट थांबवावी.तसेच पशुखाद्य विक्रेत्यांनीही पशुधन पालकांना योग्य किंमतीनुसार पशुखाद्य पुरवठा करावा. अगोदरच तोट्यात असलेला दूध व्यवसाय वाचवण्यास थोड्या-फार प्रमाणात मदत करावी.अशी मागणी ग्रामीण भागातील पशुधन पालकांतून होत आहे.