मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेमुळे मेंदूमधील सर्व प्रमुख ग्रंथी आपले काम सुरळीतपणे करू शकतात आणि शरीरातील विविध प्रकारचे हार्मोन्स योग्य प्रमाणात स्रवतात. त्यामुळे रोगांचा आपल्यावर प्रभाव पडत नाही. आज मनःशांती हरपत चाललेल्या, वाढलेल्या तणावाच्या काळात मेडिटेशन अत्यंत गरजेचे आहे. मेडिटेशनने असाध्य व्याधींचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते, असे संशोधनातूनही दिसून आले आहे.
शरीर, मन आणि आत्मा यांना एकमेकांशी जोडण्यासाठी ध्यानधारणा अर्थात मेडिटेशन उपयुक्त ठरते. ध्यानधारणा केल्याने मेंदूतील सर्व प्रमुख ग्रंथी त्याचे काम सुरळीतपणे करू शकतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सही योग्य प्रमाणात स्रवतात. त्यामुळे आजारांचा किंवा विकारांचा आपल्यावर परिणाम होऊ शकत नाही. आपण जेव्हा ध्यानमुद्रेत बसतो तेव्हा मेंदूतील अल्फा तरंगांच्या हालचाली वाढू लागतात. हे तरंग अधिक प्रमाणात असणे याचा अर्थ आपला मेंदू शांत आणि निरोगी आहे.
ध्यानधारणेदरम्यान दीर्घ श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त प्रवाहित होते. त्यामुळे उदासी आणि तणाव दूर होतो शिवाय व्यक्ती दीर्घायुषी होते.
ध्यानधारणा केल्याने
सकारात्मक विचार आणि उर्जा वाढते आणि चिडचिड होणे, उत्तेजित होणे यांसारखे अयोग्य प्रकार हळूहळू कमी घडतात. श्वासाशी निगडित नाडय़ा संतुलित होतात. त्यामुळे श्वासावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
ध्यानधारणा, सात्विक, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांच्या मदतीने थायरॉईड, रूमेटॉईड आथ्रारायटिस आणि अस्थमा सारख्या आजारांवर नियंत्रण ठेवता येते.
ध्यानधारणा दोन मिनिटे ते दोन तास एवढय़ा कालावधीसाठी करता येऊ शकते.प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आणि शारिरीक क्षमतेवर हे अवलंबून असते.
ध्यान करताना वातावरण शांत असावे आणि समतल पृष्ठभागावर बसून केले पाहिजे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी खुर्चीवर बसून ध्यानधारणा केली तरीही चालू शकते. ध्यानधारणा कोणीही व्यक्ती सहजपणे करू शकते.
ध्यानधारणा केल्याने आपल्या मेंदूचे दोन्ही भाग संतुलित राहातात. त्यामुळे शरीर आपले काम कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकते. मेडिटेशनने मनारोग्य सुधारून शरीराची कार्यक्षमता व प्रतिकारशक्तीही वाढते.
पहाटे चार वाजल्यापासून सूर्योदयापर्यंत आणि सूर्यास्तानंतर दोन तास पर्यंत आपण ध्यानधारणा करू शकतो. कारण यावेळी वातावरण शुद्ध असते. तसेच हवा शुद्ध असल्यामुळे ध्यानधारणेचा फायदा अधिक होतो. ङध्यानधारणा ही रिकाम्या पोटी करणे अधिक श्रेयस्कर असते. संध्याकाळी ध्यानधारणा करायची असेल तर जेवण झाल्यानंतर कमीत कमी तीन तास झाल्यानंतर करावे.