आज 2 ऑक्टोबर! महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती! योगायोगाने दोघात बऱयाच बाबतीत समानता होती. दोघांची साधी राहणी नि उच्च विचारसरणी! म. गांधींनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सत्य, अहिंसा, असहकार, क्षमा या शस्त्रांचा वापर केला. सामान्यातील सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच भारतातील जनतेला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत होते. लोकांनीच त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. देशाप्रमाणेच विदेशातही आपल्या कार्याने ते लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे भूतपूर्व पंतप्रधान शास्त्रीजी हे गांधीजींसारखेच उच्चविद्याविभूषित होते. सत्य, अहिंसा, क्षमा, प्रामाणिकता इ.तत्त्वे त्यांनीही आयुष्यभर पाळली. दोघांचेही मृत्यू अनपेक्षित आणि धक्कादायक होते. म.गांधींचे ‘वैष्णवजन तो तेणे कहिये…’ हे आवडते भजन होते. त्यांनी इंग्रजांना हाकलण्यासाठी ‘चले जाव’ची घोषणा दिली. शास्त्रीजींना आपल्या देशाप्रमाणेच अन्नदात्या बळीराजाबद्दल आणि देशरक्षण करणाऱया जवानांबद्दल विशेष प्रेम होते. म्हणूनच त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली. खरेतर हे दोघेही ‘सत्याचे’ पुजारी होते. शांतताप्रिय होते. क्षमाशील होते. म्हणूनच लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष आदर आहे. हे सर्व गुण सांगणारे एक सुभाषित प्रसिद्ध आहे… धर्मो जयति नाधर्म: सत्यं जयति नानृतम्। क्षमा जयति न क्रोधो देवो जयति नासुर:।। अर्थ-धर्माचा जय होतो, अधर्माचा नाही. सत्याचा विजय होतो, असत्याचा नाही. क्षमेचा जय होतो, क्रोधाचा नाही, देवांचा जय होतो, असुरांचा नाही. वरील दोन्ही महान व्यक्तींनी ते बऱयाच अंशी सिद्ध करून दाखवले आहे. गांधीजी साधा आखूड पंचा नेसत तर शास्त्रीजींचा धोतर, कोट, टोपी असा साधा वेश असे. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती त्यांच्याबाबतीत सार्थ होती. दोघांनाही सुंदर रूप, भपकेबाज पोषाख, दागदागिने यांची आवड नव्हती. कारण त्यांचे गुण हेच त्यांचे दागिने होते. अशी माणसे दुर्मिळ असतात. हेच सांगणारे हे आणखी एक सुभाषित…. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुण:। गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा।। अर्थ:- माणसाचे आभूषण(दागिना) रूप आहे, रूपाचा दागिना गुण आहे, गुणांचा दागिना ज्ञान आहे आणि ज्ञानाचा दागिना क्षमा आहे. पण आपण सामान्य माणसे वरवरच्या दिसण्याला भुलतो. ‘काय भुललासि वरलिया रंगा?’ असे संत विचारतात. कारण ते फक्त माणसांच्या अंगच्या सद्गुणांना महत्त्व देतात. आपणही ही संतांची शिकवण अंगिकारली आणि ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ तत्त्व अंगिकारले, तर लोक आपोआपच तुम्हाला मान देतील, आदर करतील. कित्येक महान व्यक्तींनी आपल्या आचरणातून हे दाखवून दिले आहे. म्हणून या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱया करताना त्यांचा एखादा तरी सद्गुण अंगी बाणवण्याचा आपण प्रयत्न करूया!
Previous Articleडोनाल्ड ट्रम्प, मेलानिया यांना कोरोनाची बाधा
Next Article आधी आरक्षण, मगच परीक्षा…!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.