प्रतिनिधी/ सातारा
शहराची हद्दवाढ झाली आहे. त्या हद्दवाढीत घेण्यात आलेल्या पाच ग्रामपंचायतींचा भाग विलिनीकरण करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी पाच पथके नेमलेली आहेत. पाच ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासून ते रेकॉर्ड पालिकेकडे वर्ग करण्याचे काम सुरु झाले आहे. सहा महिने वेगवेगळय़ा टप्यात हद्दवाढीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने पालिका प्रशासन कामाला लागले आहे.
शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यानंतर पालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतीच्या मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या ग्रामपंचायतीचे दप्तर, खुल्या जागा, इमारत कर, विविध योजना आस्थापनेतील कर्मचारी आदींची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी पालिकेकडून पाच पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. हद्दवाढीची अंतिम अधिसूचना नगरविकास विभागाने दि. 8 रोजी काढण्यात आली. सातारा पालिकेत महादरे, शाहुपूरी, विलासपुर ही गावे तर खेड ग्रामपंचायतीचा काही भाग समावेश करण्यात आला आहे. तसेच त्रिशंकू भाग असलेल्या गोडोली, आकाशवाणी झोपडपट्टी हाही भाग आला आहे.
नेमण्यात आलेल्या पथकांमध्ये लेखापाल आरती नांगरे-पाटील यांच्याकडे विलासपुर, नगरअभियंता भाऊसाहेब पाटील यांच्याकडे खेड, लेखापाल हिंमतराव पाटील यांच्याकडे दरे खुर्द, लेखापरिक्षक कल्याणी भाटकर यांच्याकडे शाहुपूरी ग्रामपंचायत देण्यात आली आहे. त्यांच्याकडून ग्रामपंचयातीचे दप्तर, निधीची माहिती, बँक खाती, मिळकत कर, चल व अचल मालमत्तांची यादी, अशा मालमत्तांवर नावे कोणाकोणाची आहेत. खुल्या जागा, इमारतीतील दुकान गाळे, ग्रामपंचायतीने घेतलेले कर्ज, आज रोजी असणारे कर्ज, पाणी पुरवठय़ाची माहिती, कचरा उचलण्याची व्यवस्था, त्याची निविदा, मुदत, ग्रामपंचायतीकडे असणारे शासनाचे अनुदान, आस्थापनेवरील मंजूर नोकरवर्ग, त्यांची सेवा पुस्तके, त्यावरील कर्मचाऱयांची माहिती, निवडणुकीचा तपशील, प्रभाग रचना, रिजनल प्लॅन, टेंडर कामामधील पीएफ, जीएसटी, इन्कम टॅक्स इत्यांदीची वजावट करण्याच्या तरतूदी अशी माहिती या पथकाकडून संकलित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली.