बेंगळूर/प्रतिनिधी
उत्तर कर्नाटकच्या काही भागात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर्षी पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार काही भागात पूर आल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये घरे खराब झाल्यामुळे लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील कावेरी आणि कृष्णा धरणात पाणी मोठ्याप्रमाणात येत असल्याने दरवाजे उघडण्यात आले आहेत.
गुलबर्गा, यादगीर आणि बिदर जिल्ह्यात पूरस्थिती अधिक तीव्र होत असून अनेक तलाव भरले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक खेडेगावात पूर आला आहे. गुलबर्गा जिल्ह्यातील चिंचोली तालुक्यात पाणी साचल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.