संथगतीने कामे सुरु, त्यामुळे अडथळा, जनतेतून संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराबरोबरच उपनगरांमध्येही स्मार्टसिटीची कामे राबविण्यात येत आहेत. मात्र स्मार्टसिटीच्या कामांचा वेग हा कासवाच्या गतीपेक्षाही कमी आहे. एक वर्षांपूर्वी अनगोळ मुख्य रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. मात्र वर्ष उलटले तरी हा रस्ता अर्धवटच आहे. या रस्त्यावरील गटारी आणि चेंबरचे कामही अर्धवट असल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. या कामाला अक्षरशः अनगोळची जनता कंटाळली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेली कामे सर्वच ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. खोदकाम करायचे आणि महिने दोन महिने त्याकडे फिरकायचेच नाही, असा प्रकार सुरू आहे. अनगोळच्या मुख्य रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्यानंतर तब्बल एक वर्ष लागुन एका बाजुचाच काँक्रिटचा रस्ता अर्धवट करण्यात आला. तर दुसऱया बाजुच्या रस्त्याकडे अजून कंत्राटदाराने फिरकूनही पाहिले नाही. एकाच बाजुचा रस्ता झाल्यामुळे त्या रस्त्यावरुन दोन्ही बाजुने येणारी वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे अपघात घडत आहेत.
वाहनांची रहदारी तर मोठय़ा प्रमाणात आहेत. वडगाव, शहापूर, अनगोळ येथील रस्त्यांचे काम सर्वच ठिकाणी अर्धवट आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाला. त्यानंतर काम थांबविण्यात आले. कामगार माघारी फिरले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. डेनेजचे पाईप घालण्यासाठी विविध ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. तेही काम अर्धवट स्थितीत आहे. डेनेज चेंबर बऱयाच ठिकाणी उघडेच ठेवण्यात आले आहेत. आता काँक्रिटचा रस्ता झाल्यानंतर खोदाई करणेही अवघड आहे. तेंव्हा प्रथम डेनेजे काम पूर्ण करुन त्यानंतर तातडीन काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
काँक्रिटच्या रस्त्यांना बराच उशीर लागत आहे. काँक्रिटचा रस्ता केल्यानंतर त्या रस्त्याच्या मजबुतीसाठी किमान 22 ते 28 दिवस पाणी मारुन त्या रस्त्यावरुन रहदारी थांबविली जाते. मात्र दोन महिने उलटले तरी अजूनही दुसऱया बाजुचा रस्ता करण्यात आला नाही. काँक्रिट घालून काही ठिकाणी डेनेजच्या चेंबरसाठी खोदाई करण्यातआली आहे. एकूणच स्मार्टसिटी होणार स्मार्ट समस्या बनणार हे आता रामभरोसेच आहे.
या रस्त्याच्या कामामुळे बऱयाचवेळा वाहतुकीची कोंडी होत आहे. या रस्त्यावरील बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे. अनगोळ ते धर्मवीर संभाजी चौकपर्यंत जाण्यासाठी 15 ते 17 रुपये खर्च येतो. मात्र आता 25 ते 30 रुपये आकारले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशालाही कात्री लागत आहे. किती दिवस अशाच प्रकारे आम्ही जगायचे? असा प्रश्न देखील करण्यात आला आहे.
सध्या अनगोळ बस ही भाग्यनगरमार्गे मारुती मंदिर, मारुती गल्ली इथपर्यंत सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी बस येईस्तोपर्यंत बराच उशीर लागत आहेत. अनेक वळणे असल्यामुळे बस चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासीही कमी असल्यामुळे परिवहन मंडळालाही तोटा सहन करावा लागत आहे. एकूणच स्मार्टसिटीच्या संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे जनतेला आणि प्रशासनालाही आर्थिक फटका बसू लागला आहे. तेंव्हा संबंधित कंत्राटदाराला तातडीने कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.