नगरोटा चकमक : पाकिस्तानी उच्चायोग अधिकाऱयाला परराष्ट्र मंत्रालयाकडून पाचारण
नवी दिल्ली, श्रीनगर / वृत्तसंस्था
नगरोटा चकमकीच्या दोन दिवसानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी पाकिस्तान उच्चायोग अधिकाऱयाला पाचारण करत घुसखोरी आणि हल्ल्यांच्या घटनांबाबत कडक शब्दात समज दिल्याचे समजते. दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे धोरण पाकिस्तानने रोखले पाहिजे, असा इशारा देत दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी भारत सज्ज असल्याची स्पष्टोक्तीही दिली.
तीन दिवसांपूर्वी नगरोटा टोलनाक्यावर झालेल्या चकमकीनंतर भारत पुन्हा एकदा दक्ष झाला आहे. जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून भारतात होणाऱया संभाव्य हल्ल्याचा कट उधळून लावल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे. तसेच प्रशासकीय पातळीवर विविध हालचालींना वेग आला असून पाकिस्तानला एक कठोर संदेश देण्याची तयारी भारताने चालवली आहे. त्यादृष्टीने परराष्ट्र मंत्रालयाने नगरोटा आणि पुलवामासारख्या घटनांचा संदर्भ देत पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱयाला पाचारण करून नाराजी व्यक्त केली. दोन शब्दांत सांगायचे तर, दहशतवादी गट पाकिस्तानचा बंदर करत आहेत. तेथून ते इतर देशांमध्ये काम करतात. पाक सरकारने आपल्या भूमीवरील दहशतवादी गटांना संपवले पाहिजे. तसेच या दहशतवादी कारवायांचा भारताला कोणताही धोका पोहचू नये यासाठी काळजी घेणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
घुसखोरीसाठी बोगद्याचा वापर
नगरोटा चकमकीचा तपास करणाऱया सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱया दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. हे दहशतवादी पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून घुसले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासूनच ट्रकमध्ये असल्याचा संशय आहे. सीमेवर असलेल्या ताराच्या कुंपणाला कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून दहशतवादी घुसल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
नगरोटाजवळ गुरुवारी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या जैशच्या दहशतवाद्यांकडे मोठय़ा प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सापडला होता. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल्स आणि पिस्तूलही जप्त करण्यात आली होती. सदर दहशतवादी मोठा घातपात करण्याची योजना आखत असल्याची शक्मयता आहे. हे चौघे काश्मीरकडे जाणाऱया ट्रकमधून प्रवास करत होते. टोल प्लाझाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविल्यानंतर चकमकीत हे चौघे ठार झाले होते.