तीस पोत्यांचे भात जळून खाक
वार्ताहर/ खानापूर
कसबा नंदगड येथील शिवारात अज्ञातांनी भाताच्या गंजीला आग लावल्याने एका गरीब शेतकऱयाचे तीस पोती भात जळून खाक झाले आहे. येथील व्हन्नव्वा देवी मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या शेतवडीत पाटील बंधुंच्या शेतात सदर घटना घडली असून सदर शेतकऱयाचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या खानापूर तालुक्यात सुगीचा हंगाम सुरू असून अनेकजण आपल्या शेतात भातकापणी केलेल्या भातगंज्या घालून शेतवडीत रस्ता होण्याची वाट पाहत आहेत. परंतु अशा भात गंज्यांना आग लावण्याचे प्रकार वाढत चालल्याने शेतकऱयांत भीती निर्माण झाली आहे. कसबा नंदगड येथील सदर पाटील बंधूंच्या शेतवडीत भात कापणी करून भातगंज्या घालण्यात आल्या होत्या. परंतु शनिवारी दुपारच्या दरम्यान सदर भातगंज्यांना आग लागण्याचे दिसून आले. वास्तविक या शेतवडी परिसरात अनेक शेतकऱयांच्या भातगंज्या आहेत. पण सदर पाटील बंधुंच्या शेतात दोन गंजींना लागलेली आग लक्षात घेता कोणीतरी जाणीवपूर्वक याठिकाणी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी माजी आ. अरविंद पाटील यांनी भेट देऊन सदर नुकसानग्रस्त महिलेला 2000 रु. आर्थिक मदत देऊन सांत्वन केले. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.