वार्ताहर / राजापूर
टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत गतवर्षी राजापूर तालुक्यातील 19 कामांना मंजुरी मिळाली होती. या सर्व कामांना जूनमध्ये कार्यारंभ आदेश प्रशासनाने दिला आहे. कार्यारंभ आदेशानंतर गेल्या 3 महीन्याच्या कालावधीमध्ये एकोणीसपैकी 10 कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही 9 नळपाणी योजनांची कामे प्रलंबित आहेत.
पुढील वर्षीचा म्हणजे 2021 संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्याची वेळ येवून ठेपली असली तरी गतवर्षीची कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने पाणीटंचाई निवारणाच्या प्रशासनाच्या उद्देशाला खीळ बसण्याची शक्यता आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी प्रशासनामार्फत पाणी टंचाई निवारणासाठी टंचाई आराखडे तयार केले जातात. त्यामध्ये विविध पाणी योजनांची कामे सुचवली जातात. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी किती कामे होतात हा प्रश्न आहे.
आजवर पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात येणारे संभाव्य पाणीटंचाई आराखडे आणि उपाययोजना केवळ कागदी घोडे ठरत आहेत. त्याला हे वर्षही अपवाद ठरलेले नाही. सन 2019-20 च्या टंचाई आराखडय़ामध्ये 19 नळपाणी योजनांची कामे मंजूर झाली होती. या यासाठी 95 लाख 77 हजार 318 रूपये रक्कम मंजूर करण्यात आली होती. जूनमध्ये या सर्व कामांना कार्यारंभ आदेश मिळालेला असताना यापैकी 10 कामे पूर्ण झाली आहेत. तर 9 नळपाणी योजनांची कामे अद्यापही रखडलेली आहेत.
अपूर्ण असलेल्या कामांमध्ये अणसुरे, पंगेरे नळपाणी योजना दुरूस्ती, जैतापूर आगरवाडी नळपाणी योजना दुरूस्ती, कोदवली हर्डी नळपाणी योजना दुरूस्ती, कशेळी दुर्गवाजी नळपाणी योजना दुरूस्ती, भालावली पिशेदवाडी नळपाणी योजना दुरूस्ती, वडदहसोळ वरची पळसमकरवाडी योजना दुरूस्ती, ओझर, तिवरे नवीन तरळवाडी योजना दुरूस्ती, वाटूळ महादेववाडी नळपाणी योजना दुरूस्ती, तुळसवडे गराटेवाडी घुमेवाडी योजना दुरूस्ती, या कामांचा समावेश आहे.
तर पूर्ण झालेल्या कामांमध्ये केळवली उगवती ठोसरवाडी योजना दुरूस्ती, ओशिवळे बागवेवाडी योजना दुरूस्ती, करक मांडवकरवाडी तात्पुरती पूरक योजना दुरूस्ती, पांगरे बुदुक गावमळा येथून नळपाणी योजना, येळवण बौद्धवाडी नळपाणी योजना दुरूस्ती, केळवली मावळती ठोसरवाडी योजना दुरूस्ती, कोदवली राववाडी, आगरवाडी, बौद्धवाडी योजना, तेरवण बाईंगवाडी, बौद्धवाडी योजना दुरूस्ती, कारवली दसवंतवाडी योजना दुरूस्ती, या कामांचा समावेश आहे. या रखडलेल्या कामांमुळे संबंधित गावांना यावर्षी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.