प्रतिनिधी / सातारा
सातारा पालिकेच्याच समोर असलेल्या छ. शाहु उद्यानाची दुरावस्था झालेली आहे. पेव्हर ब्लॉक उखडलेले आहेत. बेंच तुटलेले आहेत. पालापाचोळा तसाच कोपऱ्यात पडलेला आहे. कांरजे बंद अवस्थेत आहेत हे चित्र पहाताच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी थेट पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना फोन करुन याची कल्पना देत पालिकेचे अधिकारी पाठवून द्या इथे, असे सांगत त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे सुहास पवार, वृक्ष विभागाचे प्रणव पवार, पाणी पुरवठय़ाचे नंदू कांबळे यांना चांगलेच झापडले. दरम्यान, दि.6 पर्यंत जर बागेची स्वच्छता व नुतनीकरण न केल्यास पँथर स्टाईलने पालिकेचा कार्यक्रम करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आज छ. शाहु उद्यानात रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ते आले असता बागेत अतिशय दयनिय अवस्था दिसून येताच त्यांना सहन झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा याच बागेत असल्याने त्यांनी मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना फोनवरुन याची कल्पना देत अधिकाऱ्यांना पाठवून द्या, असे विनंती केली. बापट यांनी आरोग्य विभागाचे प्रमुख सुहास पवार यांना पाठवून दिले. पवार यांना काय पालिकेकडून स्वच्छता होत नाही, अशा कडक शब्दात झापडण्याचा कार्यक्रम सुरु केला.
त्यावर सुहास पवार यांनी लगेच पालिकेत वृक्ष विभागाचे प्रमुख प्रणव पवार आणि नंदू कांबळे यांना बोलवून घेतले. अशोक गायकवाड यांनी नंदू कांबळे यांना इथली स्वच्छता का केली जात नाही, असा जाब विचारत येत्या चार दिवसात हे ठिकाण सुस्थितीत झाले पाहिजे, अन्यथा पॅथर स्टाईलने कार्यक्रमच केला जाईल, तुम्हाला जमत नसेल तर तसे सांगा, आमचे कार्यकर्ते करतील काम. परंतु तुमचा पगार बंद केला पाहिजे, अशा शब्दात चांगलेच शाब्दीक टोले लगावले.