वहान नोंदणीसाठी झुंबड, विविध पक्ष, संघटनांचा वाढता पाठिंबा
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.14) राजधानी मुंबई येथील आंदोलनाची कोल्हापुरात जय्यत तयारी सुरु आहे. नियोजीत गाडी मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करायचाच अशा निर्धार केला आहे. मोर्चासाठी वाहन नोंदणीची झुंबड उडाली आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाज, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते झटत आहेत. सोमवारी पहाटे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या दसरा चौक येथील पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. पोलिसांनी अडवणूक केली तरीही गनिमी काव्याने राजधानीत पोहचणारच असा निर्धार समन्वयकांनी केला आहे.
दरम्यान मोर्चाच्या समान्वयक समिती सदस्यांनी शनिवारी दुपारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वारसदार समरजीत घाटगे यांची भेट घेवून आंदोलनाची माहिती दिली. यावेळी आपण स्वत: 50 चार चाकी वाहनांच्या ताफ्यासह मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. असे घाटगे यांनी समन्वयकांना सांगितले.
गेली दोन दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून मोर्चा रद्द झाल्याची बातमी फिरत आहे. त्यामुळे या मोर्चाबाबत सकल समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील, सचिन तोडकर यांनी जाणिवपूर्वक ही अफवा फसरवली जात आहे. यावर मराठा समाजाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. नियोजित गाडी मोर्चा कोणत्याही परिस्थिती निघेल, पहाटे मोर्चात सहभागी होण्यासाठी सोमवारी पहाटे पाच वाजता सकल समाजाने गाडीसह दसरा चौक येथे जमावे असे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चात दोनशे गाड्या सहभागी असतील असा दावाही केला जात आहे.
एक दिवस हक्कासाठी……..
आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील तरुणांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. शासनाला जागे करण्यकासाठी हे लोकशाही पद्धतीने आंदोलन होणार आहे. समाजबांधवानी एक दिवस समाजाच्या हक्कासाठी द्यावा.
-दिलीप पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा