अरुणादेवी एस. वाय. यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ घटप्रभा
आजच्या आधुनिक युगात व जीवनात शिक्षणाचे महत्त्व अतिश्रेष्ठ आहे. विद्या, ज्ञान नसेल तर मनुष्य जीवन हे कैदीसमान आहे, असे प्रतिपादन अखिल भारत वीरशैव महासभा महिला संघाच्या उपाध्यक्षा अरुणादेवी एस. वाय. यांनी केले.
गोकाक येथील केएलई संस्थेच्या महादेवप्पा मुनवळ्ळी इंग्रजी माध्यम हायस्कूलच्या आवारात अखिल भारत वीरशैव महासभा गोकाक घटकच्यावतीने जिल्हास्तरीय दहावी व पदवी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रतिभा पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
अरुणादेवी पुढे म्हणाल्या, पूर्वी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. स्त्रीला केवळ चूल आणि मूल सांभाळण्याबरोबरच घरातील मोलकरीण म्हणून पाहिले जायचे. मात्र, आजच्या सबलीकरणाच्या काळात महिला वर्गाने सर्व क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीस शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणाबरोबरच संस्कार, धर्म, देशप्रेम देण्यासही विसरू नये, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केएलई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व अखिल भारत वीरशैव महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, ब्रिटीश काळात भारतीयांना शिक्षणापासून वंचित रहावे लागल्याने त्यांना गुलामगिरीचे जीवन जगावे लागत होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत साक्षरतेचे प्रमाण कमी असल्याने घरी आलेले पत्र देखील दुसऱयांकडून वाचून घ्यावे लागत होते. ही परिस्थिती पाहून कोल्हापूर संस्थानच्या छत्रपती शाहू महाराज यांनी मागासवर्गीयांना शिक्षणाची सुविधा मिळवून देण्यास पुढाकार घेतला. तसेच कर्नाटक लिंगायत एज्युकेशनच्या सप्तऋषिंनी शैक्षणिक सेवा-सुविधा देण्यास प्रारंभ केला. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर केएलई संस्थेची ख्याती झाली आहे. केवळ एकाच पद्धतीचे शिक्षण न देता कमी खर्चात विविध विषयांचे शिक्षण केएलईकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. वीरशैव समाजाला मागासवर्गीय आरक्षण मिळाल्यास या समाजातील मुलांना कमी खर्चात शैक्षणिक सुविधा मिळू शकतील, यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी गदग येथील जगद्गुरु सदाशिवानंद भारती महास्वामीजी यांनीही आशीर्वचन केले. केएलईचे संचालक जयानंद मुनवळ्ळी, चेतन अंगडी, ज्योती भावीकट्टी, अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी 110 हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रतिभा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्यही देण्यात आले.
याप्रसंगी गोकाकचे नगराध्यक्ष जयानंद हुनश्याळ, गुळाप्पा होसमणी, विरपाक्षी यमकनमर्डी, मल्लिकार्जुन चुनमुरी, महांतेश तावशी, सोमशेखर मगदूम, शिवानंद गणाचारी आदी मान्यवर उपस्थित होते. आर. एम. मिरजी यांनी आभार मानले.