वार्ताहर/ कोयनानगर
शुक्रवार 1 जानेवारीला राममळा येथे राहुल काटवटे या युवकाचा रत्तातील खड्डे चुकवताना अपघात होऊन मृत्यू झाला. या अपघातास राष्ट्रीय महामार्ग विभागच कारणीभुत असल्याचे गृहित धरून या विभागावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी कोयना परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ,सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.
कराड-चिपळूण महमार्गावरील पाटण ते घाटमाथा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे. खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. 1 जानेवारी 2021 रोजी राहुल काटवटे या युवकाचा राममळा येथे रस्त्यातील खड्डे चुकवतानाच अपघात झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दीड महिन्यापूर्वीच हेळवाक येथे रस्ता रोको कररून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी महामार्ग विभागाच्या वतीने पंधरा दिवसात रस्त्याच्या कामाला सुरूवात करणार आहोत. सात कोटी रूपये संगमनगर ते घाटमाथा दरम्यानच्या रस्त्याला मंजूर झाले आहेत, असे सांगण्यात आले होते. मात्र काम सुरू झाले नाही व राहुल या युवकास आपला प्राण गमवावा लागला. पुन्हा लोकांनी रस्ता रोको केला व महामार्ग विभागाला एक बळी गेल्यानंतर जाग आली. राहुल याच्या मृत्युस महामार्ग विभागच कारणीभुत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी येथील स्थानिकांच्यातून करण्यात आली.
कोयना पोलीस ठाण्याचे सपोनी चंद्रकांत माळी यांनी महत्वाचे पाऊल उचलून महामार्ग विभाच्या अधिकाऱयांना बोलावून घेतले व रस्त्याची दुरावस्था त्यांच्या समोर मांडली. त्यांनी महामार्ग विभागाच्या सहाय्यक अभियंता श्रुती नाईक व स्थानिक यांची बैठक घडवून आणली. रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून ती मी सुद्धा अनुभवतोय. या रस्त्यासारखा खराब रस्ता कोठेही नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करत श्रीमती नाईक यांना या रस्त्याचे गांभीर्याने विचार करा व रस्त्याची दुरूस्ती ताबडतोब करा, अशी विनंती केली. श्रीमती नाईक यांनी येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरु करू, असे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थांनी या अपघातास महामार्ग विभाग कारणीभूत असून त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करा, अशी मागणी सपोनी चंद्रकांत माळी यांच्याकडे केली असता ,अपघाताचा तपास करून गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले.