वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची आघाडीवरची डिजिटल फायनान्स कंपनी पेटीएमने नववर्षाच्या प्रारंभी एक अनोखी योजना आणली आहे. त्यानुसार या कंपनीच्या माध्यमातून इच्छुकांना अवघ्या 2 मिनिटात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊ शकते. हे कर्ज व्यक्तीगत कर्जाच्या श्रेणीतील असते, असे सांगण्यात आले आहे.
या योजनेत अर्ज केल्यापासून अत्यल्प वेळात कर्ज हाती येऊ शकते. कर्ज घेणाऱयाच्या कागदपत्रांची तपासणी कमीत कमी वेळात होते. त्यामुळे अधिक काळ तिष्ठत बसावे लागत नाही, असे दावा कंपनीने केला. ही योजना अल्पावधीत लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. पारंपरिक पद्धतीने बँक किंवा वित्तसंस्थांमध्ये न जाता हे कर्ज मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे. या योजनेत अर्जापासून कर्ज वितरणापर्यंत सारे व्यवहार डिजिटल पद्धतीने होतात. त्यामुळे पात्रता कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करावी लागत नाहीत.
त्यांची पडताळणी ऑन लाईन पद्धतीने होते. ही योजना छोटय़ा आणि मध्यम शहरातील लोकांसाठी अधिक उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला.
2 लाख रूपयांपर्यंतचे हे कर्ज पगारी नोकरदार, छोटे उद्योजक, छोटे व्यापारी आणि व्यावसायिक यांच्यासाठी लाभदायक ठरू शकते. कर्जफेडीचा कालावधी 16 ते 36 महिन्यांचा आहे. फेडीच्या कालावधीनुसार समान मासिक हप्ते ठरविण्यात येत आहेत. त्यामुळे सुलभ अटींवर ते उपलब्ध आहे, असा दावा करण्यात आला.