रसिक रंजन बेळगावतर्फे लोकमान्य रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
रसिक रंजन बेळगावतर्फे रविवार दि. 10 रोजी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत जुन्या हिंदी चित्रपटांच्या केवळ सुख, समृद्धी, हर्ष, उल्हास आणि आनंदी भावनेने युक्त गाण्यांचा यामध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन प्रा. अनिल चौधरी यांचे असून यामध्ये अनुष्का आपटे, काजल धामणेकर, तन्वी इनामदार, रेहान अब्दुल रहीम, किरण जोरापूरकर, श्रीवत्स हुद्दार यांचा सहभाग आहे. निवेदन प्रा. अनिल चौधरी आणि श्रीया हुद्दार यांचे आहे.
हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील अत्यंत गाजलेली गाणी या कार्यक्रमात समाविष्ट आहेत. तलत मेहमूद, मोहम्मद रफी, मन्नाडे, मुकेश, हेमंतकुमार, किशोर कुमार, गीता दत्त, सुरैया, आमीरबाई कर्नाटकी, लता मंगेशकर, आशा भोसले या दिग्गज गायकांच्या आवाजातील गाणी यामध्ये सादर केली जातील. याशिवाय शंकर जयकिशन, नौशाद, मदनमोहन, ओ. पी. नय्यर, हुस्नलाल भगतराम, उषा खन्ना, हंसराज बहल, चित्रगुप्त, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र या संगीतकारांच्या गीतांचा कार्यक्रमात समावेश आहे.
गझल, कव्वाली, प्रणयगीत यांच्या विविध छटा ऐकायला मिळणार आहेत. तसेच एखादे गीत बनत असताना झालेल्या गंमती-जमती, काही गाण्यांच्या निर्मितीचा मजेशीर इतिहास निवेदक उलगडणार आहेत. मदनमोहन हा हळूवार हृदयाचा संगीतकार. परंतु त्याने लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्याकडून गावून घेतलेले एक आगळेवेगळे गाणेही सादर होणार आहे. नौशाद यांनी प्रयोगशीलपणे निर्माण केलेली मधुर गाणी उषा खन्ना यांची पदार्पणातीलच अद्भूत कामगिरी, हंसराज, हुस्नलाल, चित्रगुप्त यांची अविस्मरणीय गाणी ऐकायला मिळतील.
श्री रामचंद्र म्हणजे बंडखोर संगीतकार. त्यांनी वेगवेगळे प्रवाह चित्रपट संगीतामध्ये समाविष्ट केले. ओ. पी. नाय्यर म्हणजे रिधमचा बादशहा. शंकर जयकिशन म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील आरएनडी विभागाचे प्रमुखच. एस. डी. बर्मन देवआनंदच्या स्वर आणि तालाचे मूर्तिकार. सलील चौधरी म्हणजे लोकसंगीताची खाणच होय. या सर्वांच्या कर्तृत्वाची झलक या कार्यक्रमात पहायला मिळणार आहे.
केवळ 200 रसिकांना प्रवेश ही गीते सादर करणाऱया कलाकारांचा जन्म या गीतांच्या जन्मानंतर 50 ते 60 वर्षांनंतर झालेला आहे. तरीही त्यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. पुन्हा रुळावर येणाऱया जनजीवनाला मनोरंजनाची, करमणुकीची जोड ही आवश्यक बाब आहे. त्याचा शुभारंभ रसिक रंजनतर्फे होत आहे. सदर कार्यक्रम कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून होणार असून 5 वाजता कार्यक्रम सुरू होईल. केवळ 200 रसिकांना प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य या न्यायाने प्रवेश दिला जाणार आहे.