चालकाच्या समयसुचकेमुळे मोठी दुर्घटना टळली, बसची दोन- तीन दुचाकीना ठोकर
प्रतिनिधी / इचलकरंजी
वाहनधारकासह पादचारी लोकाच्या गर्दीने फुलून गेलेल्या शहरातील प्रांत कार्यालयाच्या चौकानजीक भरधाव एसटी बसचा अचानक ब्रेक निकामी झाला. त्यामुळे बस चालकाने सतर्कता दाखवित बस डिव्हायडरवर चढून थांबविण्यास यश मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. पण बस डिव्हायडरवर चढवित असताना दोन- तीन दुचाकीना बसची ठोकर बसल्याने तीन व्यक्ती जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. यांची नोंद पोलिसात झाली असून, अपघातस्थळाला पोलीस उपाअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी भेट देवून अपघाताची माहिती घेतली.
अपघातग्रस्त बस शनिवारी सकाळी नृसिंहवाडीहून अब्दुललाट मार्गे इचलकरंजीकडे सात प्रवाशी घेवून येत होती. बस शहरातील जुना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या इमारती नजीक आली असता एक दुचाकीस्वार अडवा येत असल्याचे दिसताच, बसला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता, बसचा ब्रेक निकामी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बस चालकाने सतर्कता बसमधील प्रवासना बसचा ब्रेक निकामी झाल्याची ओरडू माहिती देवून, भरधाव एसटी बसच्या वेगावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला. बसमधील प्रवाशांनी आरडा-ओरड करीत, ब्रेक निकामी झाल्याची माहिती देवू लागले. त्यामुळे प्रांत कार्यालय चौकातील वाहनधारक व पादचारी सावध होऊन ते वेळीच रस्त्यावरून दूर झाले. पण समोरील छत्रपती शिवाजी पुतळ्यानजीक वाहनधारकासह पादचारी लोकाची मोठी गर्दी बस चालकाला दिसल्याने त्याने क्षणाचा विलंब न लावता बस डिव्हायडरवर चढविण्याचा निर्णय घेतला. प्रयत्नाची पराकष्टा करीत बस डिव्हायडरवर चढवून थांबविण्यास चालकाने यश मिळविले. याच दोन- तीन दुचाकीना बसची ठोकर बसल्याने त्यावरील तीन व्यक्ती जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी त्वरीत आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे.