पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश
जिल्हय़ात सहा ठिकाणी लसीकरण केंद्र
दिवसाला 600 जणांना लस देणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यातील 30 वर्ष झालेल्या जुन्या सर्व शासकीय इमारतींचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करावे, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी कोरोना व
लसीकरणासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. त्यानंतर बैठकीची माहिती पत्रकारांना दिली.
बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. संदेश कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा केंद्र आणि पाच नगरपंचायतींना मिनी अग्निशमन यंत्रणा
इमारतींचे ऑडिट हे मोफत करण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना सांगून ऑडिट करून घ्यावे, अशा सूचना देऊन पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिह्यातील पाच नगरपंचायती आणि ओरोस प्राधिकरणासाठी मिनी अग्निशमन यंत्रणा देण्यात यावी. जिह्यातील प्रत्येक मतदारसंघात विकासकामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत.
17 रोजी चिपी विमानतळाची पाहणी
चिपी विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज आहे. विमानतळावरील विमानाचे उड्डाण म्हणजे जिह्याच्या विकासाचे उड्डाण असेल. त्यामुळे कोणीही श्रेयवाद न करता एकत्र येऊन या उद्घाटनाचे स्वागत करावे. श्रेयवादावरून जिह्याला मागे नेणे चांगले नाही. विमानतळासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातूनही निधी देण्यात आला आहे. लवकरात लवकर विमानतळ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून येत्या 17 जानेवारीला स्वतः चिपी विमानतळाची पाहणी करणार आहे. 13 जानेवारीला डीजीसीआयची टीम विमानतळाच्या पाहणीसाठी येणार आहे, असेही सामंत म्हणाले.
वैद्यकीय महाविद्यालय आणि लसीकरणासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. पाडगावकराच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागला असून त्यासाठी 1 कोटी 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. 17 जानेवारीला जिह्यातील विकासकामांसदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. त्यावेळी जिल्हा मुख्यालयात ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे सुशोभिकरण व मुख्यालयामध्ये 30 मीटर उंचीचा तिरंगा उभारण्याविषयीही अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दिवसाला 600 जणांना लस देणार
16 जानेवारीपासून सुरू होणाऱया लसीकरणाबाबत प्रशासन व आरोग्य विभाग यांनी सर्व यंत्रणा तयार ठेवावी, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, पहिल्या फेरीमध्ये जिह्यातील 9 हजार 434 डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात येणार आहे. यात खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही समावेश आहे. तसेच काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी नोंदणी केली नसल्याने हा आकडा वाढू शकतो. तर दुसऱया टप्प्यात पोलीस आणि नंतर प्रशासन, त्यानंतर 50 वर्षावरील नागरिक तसेच इतर आजार असणाऱयांना लस देण्यात येणार आहे. जिह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोस जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, कणकवली आणि शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ले व मालवण येथील ग्रामीण रुग्णालय यांचा समावेश आहे. प्रत्येक ठिकाणी दिवसाला 100 जणांचे लसीकरण या प्रमाणे जिह्यात दिवशी 600 जणांचे लसीकरण करता येणार आहे. प्रशासनाने कमीत कमी वेळात लस देता येईल, असे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत.
जिह्यातील 20 मोठय़ा ग्रामपंचायतीत व्यायामशाळा उभारावी, कचरा उचलण्यासाठी त्यांना घंटागाडी देण्यात यावी, पोलीस विभागाला एस्कॉर्टिंगसाठी पाच गाडय़ा द्याव्यात, आंबोली येथील सीसीटीव्ही प्रकल्पासाठी 52 लाखांचा निधी द्यावा. हा सर्व निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्याच्या सूचना केल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिह्यातील कोरोनाची परिस्थिती, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नगरपालिकांचा निधी व जिल्हा नियोजन समितीचा विभागवार निधी याचा सविस्तर आढावा घेतला.
पालकमत्र्यांची शिशू वॉर्डला भेट
बैठकीपूर्वी पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू वॉर्डला भेट देऊन पाहणी केली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लसीकरण यासाठीच्या तयारीची पाहणी केली.