पहिल्या दिवसअखेर भारत 6 बाद 300, रोहित-अजिंक्यची चौथ्या गडय़ासाठी 164 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
चेन्नई / वृत्तसंस्था
‘हिटमॅन’ रोहित शर्माने 161 धावांची क्लासिक दीडशतकी साकारताना अजिंक्य रहाणेसमवेत 162 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झळकावल्यानंतर यजमान भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर 6 बाद 300 धावांची दमदार मजल मारली. फलंदाजांना आव्हानात्मक अशा खेळपट्टीवर रोहितचा खेळ उत्तम बहरला आणि त्याने 231 चेंडूत 18 चौकार, 2 षटकार फटकावले. अजिंक्य रहाणेने देखील त्याला समयोचित साथ देताना 149 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावांचे योगदान दिले.
चेपॉकच्या या प्रतिकूल खेळपट्टीवर पहिल्या डावात 350 धावा उभारल्या तरी त्या 550 पेक्षा अधिक असणार आहेत आणि रिषभ पंत (33) क्रीझवर असेतोवर भारतीय डावात काहीही शक्य असेल. पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी रिषभसह पदार्पणवीर अक्षर पटेल (5) नाबाद राहिला.
रोहितने यापूर्वी आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 शतके झळकावली. पण, येथील आव्हानात्मक खेळपट्टी व अव्वल प्रतिस्पर्धी गोलंदाज यामुळे रोहित देखील येथील शतकाला अधिक महत्त्व देत असेल तर त्यात आश्चर्याचे कारण नाही. शनिवारी रोहितने दोन बाबींची काटेकोर काळजी घेतली. त्याने सर्वप्रथम फलंदाजीला प्रतिकूल खेळपट्टीवर भारताला वर्चस्व प्रस्थापित करुन दिले आणि त्यानंतर दुसरे म्हणजे, ज्यावेळी दडपण झुगारुन धावा जमवणे आवश्यक होते, त्यावेळी त्याने ही जबाबदारी देखील अगदी चोख पार पाडली.
रोहितची खेळी लक्षवेधी
जो रुटने पहिल्या कसोटीत स्वीप फटक्यांचा पुरेपूर वापर केला. पण, रोहितची प्रतिकूल परिस्थितीतील ही खेळी अधिक लक्षवेधी ठरली. कोणताही अनाठायी धोका न स्वीकारता, आक्रमक फलंदाजीवर भर देणाऱया रोहितने इंग्लंडचे फिरकीतील मुख्य अस्त्र मोईक अलीला (26-2-78-2) येथे चांगलेच धडे दिले. मोईन अली व जॅक लीच या दोघांच्याही गोलंदाजीवर सहजपणे पुढे सरसावत रोहितने उत्तम फटके साकारले. अर्थात, एखाद्या चेंडूवर चौकार किंवा षटकार वसूल केल्यानंतर त्यानंतरचा चेंडू सरस असेल तर त्याला रोहितने आदरही दिला आणि अशा रितीने त्याने आपली खेळी पुढे नेली. पहिल्या सत्रात त्याने 80 धावा फटकावल्या.
भारताने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आश्वासक युवा सलामीवीर शुभमन गिल डावातील दुसऱयाच षटकात बाद झाल्यानंतर संघाला मोठा धक्का सोसावा लागला. रोहितने पुढे पुजारासह दुसऱया गडय़ासाठी 85 धावांची दमदार आघाडी साकारली. यात पुजाराचा वाटा 58 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावांचा राहिला. पुढे पुजाराची एकाग्रता फिरकीपटू लीचने भंगली आणि स्लीपमध्ये स्टोक्सकडे सोपा झेल देत पुजारा परतला.
कर्णधार विराटकडून येथे आक्रमक खेळीची अपेक्षा गैर नव्हती. पण, पाचव्याच चेंडूवर त्याला ऑफस्पिनर मोईन अलीने त्रिफळा उडवत तंबूचा रस्ता दाखवला. फिरकीविरुद्ध खेळत ड्राईव्ह मारण्याचा विराटचा प्रयत्न यावेळी सपशेल फसला. विराट बाद झाला, त्यावेळी भारताची 3 बाद 86 अशी स्थिती होती. येथून रोहितच्या साथीला अजिंक्य रहाणे आल्यानंतर माहोल बदलून गेला.
रोहित-अजिंक्यची दमदार भागीदारी
रोहित व अजिंक्य यांनी प्रंटफूट व बॅकफूटवर एकापेक्षा एक सरस फटक्यांचा नजराणा पेश केला आणि इंग्लिश गोलंदाजांकडे यासाठी काहीच प्रत्युत्तर नव्हते. या उभयतांचे काही फटके तर इतके बिनचूक होते की, यातील काही चौकार अडवणे कोणत्याच क्षेत्ररक्षकाला शक्य नव्हते. रहाणेने 7 डावानंतर प्रथमच अर्धशतक साजरे केले. येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला अधिक पोषक असल्याने इंग्लंडने डॉम बेसऐवजी मोईनला खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या गोलंदाजांनी एकाच टप्प्यावर मारा करण्याऐवजी चेंडूला अधिक फिरकी देण्यावर भर दिला आणि याचा रोहित-अजिंक्य यांनी पुरेपूर लाभ घेण्यात अजिबात कसर सोडली नाही. पुढे रोहितने स्वीप फटक्यावर शतक साजरे केले. पुढे अवघ्या एका धावेच्या अंतरात रोहित व अजिंक्य हे दोघेही फलंदाज तंबूत परतल्याने भारताला धक्का सोसावा लागला.
रोहितने लीचला जोरदार स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण, चेंडू बॅटच्या मधोमध बसला नाही आणि डीप स्क्वेअर लेगवरील मोईनने सोपा बलून झेल टिपल्यानंतर रोहितची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर लगोलग अजिंक्य रहाणे मोईनच्या वळलेल्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. रहाणे देखील स्वीप मारण्याच्या प्रयत्नातच फसला. रुटच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी अश्विनने 19 चेंडूत 13 धावा केल्या. रिषभ पंत 56 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 33 तर अक्षर पटेल 7 चेंडूत एका चौकारासह 5 धावेवर नाबाद राहिले. इंग्लंडतर्फे जॅक लीच, मोईन अली यांनी प्रत्येकी 2 तर ओली स्टोन व जो रुट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताने या सामन्यातून बुमराहला विश्रांती दिली आहे.
धावफलक
भारत पहिला डाव ः रोहित शर्मा झे. अली, गो. लीच 161 (231 चेंडूत 18 चौकार, 2 षटकार), शुभमन गिल पायचीत गो. स्टोन 0 (3 चेंडू), चेतेश्वर पुजारा झे. स्टोक्स, गो. लीच 21 (58 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली त्रि. गो. मोईन अली 0 (5 चेंडू), अजिंक्य रहाणे त्रि. गो. अली 67 (149 चेंडूत 9 चौकार), रिषभ पंत खेळत आहे 33 (56 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), रविचंद्रन अश्विन झे. पोप, गो. रुट 13 (19 चेंडूत 1 चौकार), अक्षर पटेल खेळत आहे 5 (7 चेंडूत 1 चौकार). एकूण 88 षटकात 6 बाद 300.
गडी बाद होण्याचा क्रम
1-0 (शुभमन, 1.3), 2-85 (पुजारा, 20.2), 3-86 (विराट, 21.2), 4-248 (रोहित, 72.6), 5-249 (रहाणे, 75.2), 6-284 (अश्विन, 82.3).
गोलंदाजी
स्टुअर्ट ब्रॉड 11-2-37-0, ओली स्टोन 15-5-42-1, जॅक लीच 26-2-78-2, बेन स्टोक्स 2-0-16-0, मोईन अली 26-3-112-2, जो रुट 8-2-15-1.
कसोटीत विराटला शून्यावर बाद करणारा मोईन अली पहिला फिरकीपटू
इंग्लिश गोलंदाज मोईन अली हा कसोटी क्रिकेटमध्ये विराटला बाद करणारा पहिला फिरकीपटू ठरला. एमए चिदंबरम स्टेडियमवरील या लढतीत मोईन अलीच्या हातभर वळलेल्या चेंडूवर विराटचा त्रिफळा उडाला. विराट कसोटीत शून्यावर बाद होण्याची ही एकंदरीत 11 वी वेळ होती. यापूर्वी जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, पॅट कमिन्स, बेन हिल्फेनहॉस, मिशेल स्टार्क, सुरंगा लकमल, अबू जायेद, लियाम प्लंकेट, रवी रामपॉल व केमर रॉश या जलद-मध्यमगती गोलंदाजांनी विराटला शून्यावर बाद केले आहे. एखाद्या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर मात्र विराट प्रथमच शून्यावर बाद झला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही विराटची 26 वी वेळ. तो आतापर्यंत कसोटीत 11 वेळा, वनडेत 13 वेळा तर टी-20 क्रिकेटमध्ये 2 वेळा शून्यावर बाद झाला आहे. कोहलीला मागील 33 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही शतक झळकावता आलेले नाही. यापूर्वी 23 मार्च 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध त्याने शेवटचे शतक नोंदवले आहे.
कोटस
येथील दुसऱया कसोटीत पहिल्याच दिवशी सामन्याचा आठवा दिवस असेल, असा चेंडू वळत होता. खेळपट्टीला फिरकी गोलंदाजीची इतकी साथ पाहिली तर हा सामना कदाचित साडेतीन दिवसाच्या आतच निकाली होईल, असा माझा अंदाज आहे.
-माजी फिरकीपटू हरभजन सिंग
तिसऱया पंचांकडून दुहेरी घोडचूक, इंग्लंडला फटका
कोव्हिड-19 च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, विदेशातील पंच पाचारण करण्याऐवजी, भारतातील पंचांना या मालिकेची जबाबदारी दिली गेली आहे. मात्र, चेपॉकवर दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी तिसरे पंच अनिल चौधरी यांनी दुहेरी चुका केल्या आणि याचा इंग्लंडला फटका सोसावा लागला. सर्वप्रथम रोहित शर्मा 159 वर असताना यष्टीरक्षक बेन फोक्सने त्याला यष्टीचीत केले होते. पण, अनिल चौधरी यांनी रोहित नाबाद असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर इंग्लिश संघ अवाक राहिला. काही षटकानंतर जॅक लीचच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे फॉरवर्ड शॉर्ट लेगकरवी बॅट-पॅड झेलबाद झाला होता. हा निर्णय तिसऱया पंचांकडे सोपवला गेला. पण, येथेही चौधरी भलतेच घाईत होते. त्यांनी केवळ एकदाच रिप्ले पाहिला आणि रहाणेला नाबाद ठरवले. दुसऱया रिप्लेमध्ये चेंडू रहाणेच्या ग्लोव्हजना स्पर्शून गेल्याचे दिसून आले. ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी या निर्णयांवर टीका करताना तिसऱया पंचांनी अधिक वेळ घेतले असते तरी चालले असते, असे मत नोंदवले.
बॉक्स
अन् तब्बल वर्षभरानंतर प्रथमच स्टेडियम चाहत्यांनी बहरले!
दुसऱया कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी येथील चेपॉक स्टेडियम चाहत्यांनी अक्षरशः फुलून गेले आणि जणू खेळाला पूर्ववैभव लाभले. तामिळनाडू क्रिकेट संघटनेने या सामन्यासाठी 15 हजार चाहत्यांना प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वी जाहीर केला होता, त्याची येथे अंमलबजावणी झाली. कोव्हिड-19 च्या संकटानंतर स्टेडियममध्ये चाहत्यांना प्रवेश देण्याची ही पहिलीच वेळ ठरली. प्रवेशद्वारावर सर्व चाहत्यांची प्राथमिक तपासणी झाली आणि कोव्हिड-19 ची लक्षणे नाहीत, अशा चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला. व्हीव्हीएस लक्ष्मण व वासिम जाफर यांनी ट्वीट करत स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहणे उत्साहवर्धक होते, असे नमूद केले.