शेतकरी वर्गात संतापाची लाट
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील जवळपास पस्तीस हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम विद्युत कंपनीने सुरू केले असून अचानक सुरू केलेल्या या मोहिमेमुळे शेतकऱ्यातील संतापाची लाट पसरली आहे. चारी बाजूंनी शेतकरी अडचणीत आहे. एकीकडे राज्य शासन ठाकरे सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत असताना वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र बेधडक कारवाई करत ट्रान्सफार्मर बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत वीजवितरण कंपन्यांचे अधिकार्यांशी संपर्क साधला असता किमान चालू बिल तरी शेतकऱ्यांनी भरले पाहिजे अन्यथा आम्हाला वीज तोडल्या शिवाय पर्याय नाही अशा शब्दात खुलासा दिला.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे वीज बिल माफ करू असे पत्रकार परिषदेत व विधिमंडळातील स्पष्ट केले होते मात्र, कारणे वेगळी याप्रमाणे शासन वागत आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे या प्रश्नात बोलायला तयार नाहीत. तो विषय काँग्रेसच्या या खात्यातील मंत्र्याकडे असल्याचे सांगत राष्ट्रवादी या प्रश्नाला बगल देत आहे.
भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या काळात शेतकऱ्यांची कधीही वीज तोडण्यात आलेली नव्हती मात्र आता थेट ट्रान्सफार्मर बंद करून सर्व गावेच्या गावे अंधारात टाकण्याचे काम वीज मंडळाने सुरू केले आहे. करमाळा तालुक्यात ३५ हजार कृषी पंपाचे कनेक्शन असून आज सकाळपासून हे कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली आहे. आज करमाळा भागातील मांगी ट्रांसफार्मर बंद करून वीज तोडणी सुरुवात केली आहे.
याबाबत बोलताना प्रगतशील शेतकरी सुजित बागल म्हणाले की, कोरोनामुळे शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले आहेत. लाखो रुपयांचा भाजीपाला रस्त्यावर फेकून द्यावा लागला. कुठेतरी आता शेतकरी सावरतोय तोच वीज कनेक्शन कट करून शेतकऱ्याला या शासनाने शॉक दिला आहे. शेतकऱ्यांची विज बिल भरण्याची क्षमता नसून संपूर्णपणे वीज बिल माफ करावे अशी मागणी सुजित बागल यांनी केली आहे.