डॉक्टर्सनी अनुमती दिल्यास लोकसभा अधिवेशनात होणार सहभागी
प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांना सुमारे दीड महिन्याच्या उपचारानंतर काल बुधवारी सकाळी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळातून घरी पाठविण्यात आले. ते प्रथम आपल्या मूळ गावी म्हणजे आडपई येथे जाणार असून तेथे तीन ते चार दिवस वास्तव्य करून नंतर सापेंद्र-रायब्ंादर येथील निवासस्थानी येणार आहेत. डॉक्टर्सनी अनुमती दिली तर 8 मार्च रोजी दिल्ली येथे जाणार असून लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार, असल्याची माहिती त्यांनी इस्पितळातून बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना दिली.
जानेवारी महिन्यात कर्नाटकातील अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर एक महिना बारा दिवस उपचार केल्यानंतर आता त्यांना घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. घरी पाठवले असले तरी काही दिवस उपचार सुरूच राहणार असून यासाठी त्यांना गोमेकॉत जावे लागणार आहे.
गोमंतकीय जनता, गोमेकॉतील डॉक्टर्स इतर कर्मचारी वर्ग, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, अनेक केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री अशा सर्वांच्या सहकार्याने, प्रार्थनेने आपण बरा झालो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
भेटण्याची घाई करू नका ! दरम्यान, आपणास भेटण्यासाठी लोकांनी घाई करू नये. त्यांनी आणखी 15 ते 20 दिवस थांबांवे, नंतर आपण भेटण्यासाठी उपलब्ध होणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. बुधवारी दुपारी 12 वा. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना गोमेकॉतून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या विनंतीनुसार इतर वेळेत कुणालाच भेटता येणार नसून फक्त दुपारी 4 ते सायं. 6 वा. पर्यत श्रीपाद नाईक कार्यकर्ते व हितचिंतकांसाठी उपलब्ध राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.