महामार्गावर तीन अपघातांची मालिका
प्रतिनिधी/ भुईंज
पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी मध्यरात्री तर अपघाताची मालिकाच झाली. सुरुरनजिक दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर पाचवडजवळ झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला. तसेच रेठरे बुद्रुक ट्रक्टच्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या चार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. टोल प्रशासन नुसताच टोल वसूल करत आहे, मात्र सुविधा पुरवत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित राहिला आहे.
सुरुर येथे अपघातात मसूरच्या दोन युवकांचा अंत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरुर उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून झायलो कारने जोरदार धडक दिली. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात मसूर (ता. कराड) येथील दोन युवकांचा दुदैवी मृत्यू झाला. केदार दत्तात्रय वेल्हाळ (वय 25) व अजय रवींद्र सुतार (वय 27) अशी मयत युवकांची नावे आहेत.
या अपघाताची भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री सुरुर उड्डाण पुलावर मालट्रकचा टायर फुटल्याने उभ्या असलेल्या या मालट्रकला पाठीमागून येणाऱया झायलो गाडी नंबर MH 04 GD 1205 या चालकाने ठोकरल्याने झायलो गाडीतील दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सातारा येथे दाखल केले, परंतु ते मयत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दोन्ही वाहने साताराचे दिशेने येत होती. मयत झालेले मसूर (ता. कराड) येथील युवक केदार दत्तात्रय वेल्लाळ (वय 25) व अजय रवींद्र सुतार (वय 27) अशी आहेत. मध्यरात्रीच्या अंधारात सुरुर ग्रामस्थांनी मदतकार्य देऊन भुईंज पोलिसांना घटनास्थळी बोलवले. भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पीएसआय रत्नदीप भंडारे, हवालदार विजय अवघडे, हवालदार सचिन नलवडे, चालक वाघ हे घटनास्थळी हजर झाले.
जिवलग मित्र काळाच्या पडद्याआड
सुरुर (ता. वाई) येथे झालेल्या अपघातात मसूर येथील अजय राजेंद्र सुतार व केदार दत्तात्रय वेल्हाळ हे दोन युवक ठार झाल्याने विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. अजय हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीस होता. तो चार दिवसांपूर्वी मसूरला गावी आला होता. तो आणि त्याचा मित्र केदार हे पाहुण्यांची झायलो कार आणण्यासाठी मुंबईला गेले होते. परतत असताना त्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. केदार शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता. तर अजयच्या लग्नग्नाचा साखरपुडाही नुकताच झाला होता. एप्रिलमध्ये त्याचे लग्नग्न होणार होते. दोघांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन जिवलग मित्र एकाच वेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुरुर गावच्या हद्दीत अपघातात एकाचा मृत्यू
सुरुर (ता. वाई) गावच्या हद्दीत झालेल्या दुसऱया दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विश्वजीत रुद्राक्ष साळुंखे (वय 20, रा. भुईंज, ता. वाई) हा आकाश अशोक भोसले (रा. शिरगाव, ता. वाई) यांच्यासमवेत दुचाकीवरून शिरवळ येथून भुईंजकडे जात असताना सुरुर गावच्या हद्दीत झालेल्या दुचाकी अपघातात विश्वजीत साळुंखे हा गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच विश्वजीतचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पाचवड येथे दुचाकी दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू
पुणे सातारा महामार्गावरील पाचवड (ता. वाई) गावच्या हद्दीतील मध्यरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी शेवाळे वस्तीवर भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अनिल चंद्रकांत खेत्रे यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेले (नाव समजू शकले नाही) गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास भुईंज पोलीस करीत आहेत.