कोलकाता / वृत्तसंस्था
भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकेकाळी भाजपच्या थिंक टँकमध्ये त्यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे 2018 मध्ये ते भाजपमधून बाहेर पडले होते. भाजपला रामराम ठोकल्यापासून सिन्हा राजकीय जीवनापासून विलग झाले होते. मात्र आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत तृणमूलमध्ये प्रवेश करून त्यांनी चर्चेची राळ उडवून दिली आहे. सिन्हा हे ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार होतील अशी शक्मयता वर्तवण्यात येत आहे.
तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे किती फायदा होईल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. यशवंत सिन्हा हे मूळचे बिहारचे असले तरी त्यांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव मोठा आहे. भाजपमध्ये असताना त्यांनी विविध पदांवर सक्रियपणे काम केले होते. तसेच त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्याच काळात म्हणजे 1990-91 मध्ये भारताच्या प्रख्यात खासगीकरण, जागतिकीकरण धोरणाची बिजे रोवली गेली होती. या त्यांच्या अनुभवाचा लाभ तृणमूल काँग्रेसला होऊ शकतो.
……