दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथी वनडे आज, दीप्ती शर्मा, सुषमा वर्माकडून भरीव खेळ अपेक्षित
वृत्तसंस्था / लखनौ
यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-1 अशी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील चौथ्या सामन्याला रविवारी येथे सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल. यजमान भारताला बरोबरीसाठी या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. भारतीय संघातील अष्टपैलू दिप्ती शर्मा आणि यष्टीरक्षक व फलंदाज सुषमा वर्मा यांना सूर मिळविणे आवश्यक आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एकतर्फी पराभव केल्यानंतर मिथाली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या तिसऱया सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 6 धावांनी पराभूत करत पुन्हा आघाडी घेतली. पावसाच्या अडथळय़ामुळे पंचांनी या सामन्याचा निर्णय डकवर्थ लेवीस नियमाच्या आधारे लावला. या तिसऱया सामन्यात दक्षिण आफ्रिकेची लिझेली ली हिने 131 चेंडूत नाबाद 132 धावांची निर्णायक खेळी केली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 248 धावा जमविल्या होत्या.
भारतीय संघाची स्थिती एकवेळ भक्कम होती पण शेवटच्या पाच षटकांत भारतीय फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. शेवटच्या 30 चेंडूत भारताने केवळ 27 धावा जमविल्या. भारतीय संघाची उपकर्णधार हरमनप्रित कौरला फलंदाजीचा सूर मिळालेला दिसत नाही. रविवारच्या चौथ्या सामन्यात भारतीय फलंदाज शेवटच्या 10 षटकांत अधिक धावा जमविण्याचा प्रयत्न करतील. असा विश्वास कर्णधार मिथाली राजने व्यक्त केला आहे.
उपकर्णधार हरमनप्रित कौर तसेच अष्टपैलू दिप्ती शर्मा आणि यष्टीरक्षक सुषमा वर्मा यांच्या कामगिरीवरच भारताचे यश अवलंबून राहील. भारताच्या तळाच्या फलंदाजांकडून अधिक धावांची अपेक्षा आहे. सलामीची रॉड्रिग्ज फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. स्मृती मंदाना आणि पुनम राऊत यांची कामगिरी बऱयापैकी होत आहे. भारतीय संघाचे कर्णधार मिथाली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा ओलांडला असून अशी कामगिरी करणारी ती जगातील दुसरी फलंदाज आहे.
अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी, फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड तसेच मानसी जोशी यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. दक्षिण आफ्रिकेची लि हिने या मालिकेत तीन सामन्यात 219 धावा जमविल्या आहेत. पहिल्या सामन्यात तिने 83 तर तिसऱया सामन्यात तिने नाबाद 132 धावा जमविल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेची शबनिम इस्माईल ही आतापर्यंत या मालिकेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली असून तिने तीन सामन्यांत 6 बळी मिळविले आहेत. तसेच कॅप आणि मेल्बा यांनी प्रत्येकी 2 बळी घेत इस्माईलला चांगली साथ दिली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. नाणेफेकीनंतर दोन्ही संघ आपले अंतिम 11 खेळाडू जाहीर करतील.