सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेत पंतप्रधान मोदी यांची सूचना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काही राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा बिघडत आहे. या राज्यांनी तसेच इतरही राज्यांनी या विषाणूची दुसरी लाट थोपविण्यासाठी त्वरेने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा गंभीर परिणाम संभवतात, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याना दिला. बुधवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.
देशातल्या महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रात परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या बेतात आहे. गेल्या आठवडय़ात देशात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक केवळ महाराष्ट्रात सापडले आहेत. त्याखालोखाल केरळ आणि पंजाब येथे धोका वाढला आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशात, तसेच उत्तर प्रदेशात रुग्णसंख्या वाढताना दिसते. या पार्श्वभूमीवर ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.
70 जिल्हय़ांमध्ये समस्या
देशाच्या 70 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे रुग्ण गेल्या महिन्याभरात 150 टक्क्यांहून (दीडपट) अधिक प्रमाणात वाढले आहेत. चाचण्यांच्या संख्येच्या तुलनेत बाधितांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. याचवेळी हा प्रसार रोखला नाही तर देशभरात पुन्हा या विषाणूचा उदेक होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
उत्कृष्ट संघर्ष
भारताने गेले सहा महिने कोरोनाशी उत्तम संघर्ष केला आहे. बहुतेकांनी नियमांचे पालन केल्याने लाट आटोक्यात आली होती. तथापि, नंतरच्या काळात काहीशी ढिलाई आणि दुर्लक्ष करण्यात आले. आता कोरोनाचे संकट संपले अशा भावनेने शिस्तपालनात शिथिलता आली. त्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. हीच वेळ या रोगाला आळा घालण्याची आहे, अशा अनेक सूचना पंतप्रधान मोदी यांनी केल्या.
छत्तीसगड मुख्यमंत्री अनुपस्थित
बुधवारच्या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बाघेल अनुपस्थित होते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही. तसेच त्यांनी आधी तशी सूचना दिली होती की नव्हती हे देखील समजू शकले नाही. छत्तीसगडमध्येही गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे.
तीन ‘टी’चा मंत्र
‘टेस्ट, ट्रक अँड ट्रीट़’ (चाचणी, मागोवा आणि उपचार) हा इंग्रजी ‘टी’ युक्त मंत्र यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला. ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रसार अधिक आहे, तेथे चाचण्यांचे प्रमाण वाढविले पाहिजे. त्याचप्रमाणे जे रुग्ण सापडतील ते आधी कोणाच्या संपर्कात आले होते, त्याचा मागोवा घेतला पाहिजे. तसेच रुग्णांवर उपचारही केले पाहिजेत ही त्रिसूत्री त्यांनी सांगितली. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण झाले पाहिजे. राज्यांनी यात हयगय करू नये. लसीचा तुटवडा देशात नाही, असे अनेक मुद्दे पंतप्रधान मोदी यांनी मांडले.
लसींसंबंधी वाद
केंद्राकडून कमी प्रमाणात लसीचे डोस मिळाले असा आक्षेप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नोंदविला. मात्र, राज्याला दिलेल्या लसींपैकी 22 लाख डोस अद्याप उपयोगातच आणले गेले नाहीत, असे प्रत्युत्तर नंतर भाजपकडून देण्यात आले. पश्चिम बंगालला 40 लाख डोस पुरविण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 18 लाख टोचण्यात आलेले आहेत. उरलेले तसेच पडून आहेत, असा आरोप केंद्र सरकारकडून ममता बॅनर्जी यांच्यावर झाला आहे.
महाराष्ट्र सरकारवरही पलटवार
महाराष्ट्र सरकारनेही केंद्र सरकारवर पुरेशा लसी न पुरविल्याचा आरोप केला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून 54 लाख डोस पुरविण्यात आले आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 23 लाख उपयोगात आणले गेले. उरलेले 31 लाख पडून आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने स्वतःची कार्यक्षमता सुधारावी, अशी सूचना जावडेकर यांनी केली.