प्रतिनिधी/ सातारा
शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले पोवाईनाका येथे पुणे-मुंबई येथून येणाऱया वाहनधारकांची दिशाभूल होत आहे. शिवतिर्थाला वळण मारून जाण्याऐवजी सरळ मार्गे वर चारचाकी वाहन येत आहे. यामुळे राजपथ, कर्मवीर पथ या मार्ग येणाऱया वाहनधारकांचा गोंधळ उडत आहे. येथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे. मात्र नगरपालिका बांधकाम विभाग, वाहतूक शाखा कि सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की हे काम कुणाचे याबाबत चौकशी केली असता जबाबदारी झटकण्याचे प्रकार समोर येत आहेत.
सध्या ग्रेडसेपरेटर जरी खुला असला तरी नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. त्यामुळे बहुतांश वाहतूक वरुनच सुरू आहे. राजपथ व कर्मवीरपथ येथून येणाऱया वाहनांची संख्या जास्त असते. पोवईनाक्यावर उतारामुळे या वाहनांचा वेग प्रचंड असतो. या सुसाट वाहनांमुळे पुढील वाहनधारकांची चांगलीच पाचावरण धारण होत आहे. यामुळे एसटी स्टॅड, जिल्हा मध्यवर्ती बॅक, सिव्हिल हॉस्पिटल मार्ग येणारी वाहने यांचा चांगलाच मिलाप होत असतो. यातच पुणे-मुंबई येथून येणाऱया चारचाकी वाहनधारकांची भर पडताना दिसत आहे. प्रवासादरम्यान मुंबई-पुणे येथून येणाऱया वाहनधारकांना शिवतिर्थाला वळण मारून येण्याची माहिती नसल्याने ही वाहनधारक सरळ राजपथावर येत आहेत. काही दिवसापुर्वीच अपघाताची घटना येथे घडली आहे. यामुळे या ठिकाणी मोठे दिशादर्शक फलक लावण्याची गरज निर्माण झाली आहे. येथे फलक लावले आहेत. मात्र ते फलक वाहनधारकांना दिसत नसल्याने पुणे-मुंबई येथील प्रवाशी नियम मोडत आहेत. यांचा फटका सातारकरांना सोसावा लागत आहे. दररोज जीवमुठीत घेवून प्रवास करणे भाग पडत आहे. तरीही प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
अभियंता, सभापती, पोलीस निरिक्षकांचे हात वरच
पोवईनाका येथे दिशादर्शक फलक मोठय़ा आकाराचे लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तरीही याबाबत कोणतीच पावले उचलण्यात येत नाहीत. यांची चौकशी सार्वजानिक बांधकाम विभागाचे अभियंता अहिरे, सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार, आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक विठ्ठल शेलार यांनी
जबाबदारी संबंधित विभागाची आहे. असे सांगत हात वर केले. यामुळे सातारकर वाहनधारकांनी नक्की दाद मागायची कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.