धार्मिक ध्रुवीकरण स्पष्ट, भाजप-तृणमूलमध्ये चुरशीचा संग्राम
कोलकाता / वृत्तसंस्था
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आज गुरूवारी विधानसभा निवडणुकांच्या दुसऱया टप्प्याचे मतदान होत आहे. आसामच्या 47 तर पश्चिम बंगालच्या 30 जागांवर मतदान उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद करणार आहेत. तथापि, साऱया देशाचे लक्ष वेधून घेतलेला नंदीग्राम मतदारसंघ सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
या मतदारसंघात राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि एकेकाळी त्यांचेच उजवे हात मानले गेलेले पण आता भाजपमध्ये समाविष्ट झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात अतिचुरशीचा संग्राम आहे. ममता बॅनर्जी तृणमूल काँगेसच्या एकमेव मुख्य प्रचारक आहेत. मात्र, त्या गेले चार दिवस अन्यत्र कोठेही प्रचारासाठी न जाता याच मतदारसंघात तळ ठोकून आहेत, यावरून ही निवडणूक त्यांना सोपी नाही, असे बोलले जात आहे.
धार्मिक ध्रुवीकरण अटळ
नंदीग्राम मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण अटळ आहे, असे तज्ञांचे मत आहे. भाजप आणि तृणमूलच्या प्रचाराची दिशा हीच आहे. तृणमूलचा प्रमुख भर मुस्लीम मतदारांवर तर भाजपचा हिंदू मतदारांवर आहे. या मतदारसंघात हिंदू साधारणतः 69 टक्के, मुस्लीम 29 टक्के तर ख्रिश्चन 1 टक्का असे प्रमाण आहे.
नंदीग्राम 1 विरूद्ध नंदीग्राम 2
नंदीग्राम मतदारसंघातच अप्रत्यक्षपणे हिंदूंची संख्या जास्त असणारा आणि मुस्लीमांची संख्या अधिक असणारा असे दोन भाग पडले आहेत. राजकीय नेते त्यांना नंदीग्राम 1 आणि नंदीग्राम 2 असे संबोधतात. वास्तविक दोन्ही भागांमध्ये हिंदूंची संख्या मुस्लीमांपेक्षा जास्त आहे. नंदीग्राम 1 मध्ये हिंदू 65 टक्के तर मुस्लीम 34 टक्के आणि ख्रिश्चन 1 टक्का असे सर्वसाधारण प्रमाण आहे. तर नंदीग्राम 2 मध्ये हिंदू 89 टक्के, मुस्लीम 11 टक्के तर ख्रिश्चन 1 टक्का असे प्रमाणे असल्याचे सांगितले जाते. भाजपचा मूलाधार हिंदू मतदार आहे.
प्रचाराचा भर नंदीग्राम 2 मध्येच
या मतदारसंघातील प्रचाराचा बहुतेक सारा भर नंदीग्राम 2 मध्ये दिसून येतो. येथे हिंदूंची संख्या 88 टक्के असल्याने वेगवेगळय़ा कारणांसाठी भाजप आणि तृणमूल या पक्षांनी येथेच लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपचा भर हिंदू मतदारांवर असल्याने हा भाग त्याच्यासाठी निर्णायक ठरू शकतो. तर तृणमूलला मुस्लीम मतांची शाश्वती वाटते. त्यामुळे त्यांची संख्या अधिक असणाऱया भागावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा हिंदू मते मिळविण्यासाठी हिंदूबहुल भागावर त्याचाही असल्याचे दिसते. त्यामुळे नंदीग्राम 1 शांत तर नंदीग्राम 2 मध्ये सारी गजबज दिसते.
बॅनर्जींनी उच्चारले आपले गोत्र
नंदीग्राममधील धुवीकरणामुळे प्रचाराच्या पद्धतीमध्ये ममता बॅनर्जींना बदल करावा लागला. त्या आता भर सभेत चंडीपाठ करतात. दोन दिवसांपूर्वी तर त्यांनी आपले गोत्र शांडिल्य असल्याचाही जाहीर उच्चार केला. स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि जातीनिरपेक्ष मानणाऱया ममता बॅनर्जी यांनी जाहीररित्या गोत्राचा उल्लेख करावा याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यांना पराभव होण्याची भीती वाटत आहे, म्हणूनच त्या हिंदू धर्माचा आधार घेत आहेत, अशी टीका भाजपने केली आहे.
लोकप्रिय घोषणा ‘जय श्रीराम’
‘बोले बोले नंदीग्राम…जय श्रीराम, जय श्रीराम’ ही घोषणा या मतदारसंघात तसेच पश्चिम बंगालमध्ये सर्वत्रही लोकप्रिय होत आहे. या घोषणेला आयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य राममंदिराची पार्श्वभूमी आहे. आजवर उत्तर प्रदेश किंवा हिंदी भाषिक भागात लोकप्रिय असणारी जय श्रीराम ही घोषणा आता पश्चिम बंगालमध्ये प्रभाव टाकणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.