प्रतिनिधी/ लांजा
सायंकाळी होणाऱया स्वतःच्या साखरपुडय़ाची खरेदी करून दुचाकीवरून घरी निघालेल्या 22 वर्षीय तरुणावर अर्ध्या वाटेतच काळाने घाला घातला. दुचाकीवरील ताबा सुटून पुढे असणाऱया इर्टिगा कारला मागून धडक देत ओव्हरटेक करत असतानाच दुचाकीसमोरून येणाऱया चिरा वाहतूक करणाऱया ट्रकवर जाऊन धडकली. यामध्ये दुचाकी चालक तरुणाच्या पाय व डोक्यावरुन ट्रकची चाके गेल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला तरुण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 12.15च्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर शहरातील उकळी गॅरेजसमोर घडली.
अक्षय केशव सोलीम (22, रा. ओशी, ता. रत्नागिरी) असे अपघातात जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नीलेश वासुदेव घाणेकर (25, रा. ओशी, ता. रत्नागिरी) हा किरकोळ जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी एकेरी सुरू होती. जखमी झालेल्या नीलेश घाणेकरला लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातस्थळी साखरपुडय़ासाठी घेतलेले साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.
सुखी संसाराच्या स्वप्नांना अपघाताचे ग्रहण
अक्षय सोलीम याचा काही तासाभराने होणारा साखरपुडा आणि केवळ दोन दिवसांवर असणाऱया लग्नाआधीच झालेल्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने सारेच हेलावून गेले आहेत. त्याच्या सुखी संसाराच्या स्वप्नांना या अपघाताचे ग्रहणच लागले.
या अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील ओशी येथील अक्षय सोलीम या तरुणाचा रविवारी सायंकाळी साखरपुडा होता. यानिमित्ताने साखरपुडय़ाचे सामान खरेदी करण्यासाठी तो शेजारी राहणारा मित्र नीलेश घाणेकर असे दोघे लांजा बाजारपेठेत आले होते. लांजा येथे सकाळी साखरपुडय़ाचे सामान खरेदी करून अक्षय आपल्या दुचाकीने (डीओ स्कूटर एमएच 08,- डब्ल्यू 9466) घरी परतत असताना दुपारी 12.15 च्या दरम्यान लांजा कुंभारवाडीसमोरील इर्टिगा कारला (क्र. एमएच 01, डिके 8357) ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याने प्रथम इर्टिगा कारला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर तो कारच्या ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन धडकला. याचदरम्यान समोरून देवधे ते लांजाच्या दिशेने येणाऱया ट्रकवर (क्र. एमएच 09,5559) आपटला. ट्रक संतोष सत्यवान रसाळ हा चालवत होता. त्यानंतर अक्षय ट्रकच्या पाठीमागील चाकात गेला. ट्रकची चाके अक्षयच्या पाय व डोक्यावरून गेल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या नीलेश घाणेकर हा दुचाकीवरून रस्त्याबाहेर फेकला गेल्याने तो सुदैवाने बचावला. तो किरकोळ जखमी झाला. या अपघातामुळे लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतून काही काळ एकेरी सुरू होती.
दरम्यान बेदरकारपणे दुचाकी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दुचाकीस्वार अक्षय सोलीम याच्यावर भादंवि कलम 304, 279, 337, 338, मोटार ऍक्ट कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव करीत आहेत.
ऐन शिमगोत्सवात ओशी गावावर शोककळा
अक्षय हा सर्वात लहान असल्याने आई-वडिलांचा लाडका मुलगा होता. महिनाभरापूर्वीच अक्षयने नवीन डय़ुओ दुचाकी घेतली होती. वडील व मोठय़ा भावासोबत तो कामानिमित्त मुंबईत रहायचा. तर आई गावी एकटीच राहत होती. घरच्यांनी अक्षयचे लग्न जुळवल्याने बुधवारी 7 एप्रिल रोजी लांजा तालुक्यातील एका गावातील तरुणीशी लग्न सोहळा होणार होता. लग्न असल्याने अक्षय व त्याचे वडील, भावासह सर्वजण 8 दिवसांपूर्वी गावी आले होते. घरात लग्न असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात असतानाच ही दुर्घटना घडली. ऐन शिमगोत्सवात घडलेल्या या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.